टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटील मास्टर अर्थात सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीवर जोरदार टीका केली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात गुरुवारी 25 मार्च रोजी हैदराबाद विरुद्ध बंगळुरु सामना पार पडला. विराटने या सामन्यात हैदराबाद विरुद्ध संथ खेळी केल्याचा ठपका ठेवत सुनील गावस्कर यांनी खडेबोल सुनावले. विराटला चांगल्या स्ट्राईक रेटने खेळायला हवं होतं, असं गावस्कर यांचं म्हणणं आहे. विराटने हैदराबाद विरुद्ध अर्धशतक खेळी केली. विराटने 51 धावांची खेळी केली. विराटचं हे आयपीएलमधील 53 वं अर्धशतक ठरलं. विराटने या 53 धावा करण्यासाठी 43 चेंडूंचा सामना केला. आरसीबीने या सामन्यातील पहिल्या डावात 7 विकेट्स गमावून 206 धावांपर्यंत मजल मारली.
“विराट कोहली याने सामन्यातील मधल्या काही ओव्हरमध्ये लय गमावली असं वाटलं. मला निश्चित आठवत नाही, मात्र त्याने 31-32 ते आऊट होईपर्यंत चौकार लगावला नाही, अखेर तो आऊट झाला. जेव्हा तुम्ही डावातील पहिला चेंडू खेळता आणि 14-15 व्या ओव्हरमध्ये आऊट होता, तेव्हा तुमच्याकडून 118 चा स्ट्राईक रेटची अपेक्षा टीमला नसते”, असं गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हणाले.
दरम्यान या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली याव्यतिरिक्त रजत पाटीदार याने झंझावाती अर्धशतक ठोकलं. रजतने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. रजतने या खेळीदरम्यान सलग 4 षटकार खेचले. रजतने मयंक मार्कंडे याच्या बॉलिंगवर हे 4 सिक्स खेचले. तसेच अखेरीस ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याने 20 बॉलमध्ये 37 धावांची नाबाद खेळी केली. तर स्वपनिल सिंहने 6 बॉलवर 12 धावा केल्या. आरसीबीच्या फलंदाजांनी अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे 200 पार मजल मारता आली. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 206 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.