आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु झालाय. यंदाच्या सीजनच वैशिष्ट्य म्हणजे विराट कोहलीची बॅटिंग. क्रिकेट चाहत्यांना विराटच्या फलंदाजीत या सीजनमध्ये एक वेगळीच चमक दिसून येतेय. ओपनिंगला येऊन विराट कोहली आक्रमक बॅटिंग करतोय. आयपीएलचा सीजन संपल्यानंतर T20 वर्ल्ड कप आहे, त्याचा विचार करता विराट कोहलीचा हा आक्रमक फॉर्म टीम इंडियासाठी एक चांगली न्यूज आहे. चालू सीजनमध्ये विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 3 सामन्यात सर्वाधिक 181 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर RCB मध्ये दिनेश कार्तिकच्या नावावर सर्वाधिक 86 धावा आहेत. आरबीसीने तीन सामन्यात आतापर्यंत जितक्या धावा केल्या आहेत, त्यातल्या 45 टक्के धावा एकट्या विराट कोहलीच्या आहेत. काल कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये आयपीएलचा 10 वा सामना झाला. या मॅचमध्ये आरसीबीकडून एकट्या विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. यात 4 फोर, 4 सिक्स होते.
विराटच्या फलंदाजीच्या बळावर आरसीबीने 6 बाद 182 धावांचा डोंगर रचला. पण कोलकाता नाइट रायडर्सने तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. विराट सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याला टीम मधल्या अन्य फलंदाजांकडून साथ मिळण तितकच गरजेच आहे. आरसीबीच्या टीममध्ये ग्लेन मॅक्सवेल, फाफ डु प्लेसीस आणि कॅमरुन ग्रीनसारखे स्टार फलंदाज आहेत. पण काल KKR विरुद्धच्या सामन्यात एकटा कोहली उभा राहिला. त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. दिनेश कार्तिक, कॅमरुन ग्रीन आणि मॅक्सवेलने बऱ्यापैकी धावा केल्या. पण त्यांच्यापैकी एकानेही कोहलीसोबत मोठी भागीदारी केली नाही. फाफ, रजत पाटीदार आणि अनुज रावत छाप उमटवण्यात अपयशी ठरले. आरसीबी-केकेआर सामन्यानंतर प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आरसीबीच्या अन्य फलंदाजांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
“टीममधील अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली असती, तर विराट कोहलीने नक्कीच 120 धावांपर्यंत मजल मारली असती. एकटा कोहली किती करणार? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एकट्या माणसाचा खेळ नाही” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले. विराटने सामन्यात सर्वाधिक 83 धावा केल्या. मॅच संपल्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप त्याला देण्यात आली.