Kharif Season : उत्पादन बेभरवश्याचे, वाढती महागाई अन् खर्च मात्र शाश्वत, सांगा शेती करायची कशी?

| Updated on: Jul 01, 2022 | 9:33 AM

शेतात राबल्याशिवाय काहीच पदरी पडत नाही हे वास्तव आहे. असे असताना शेती कामासाठी मजुरच मिळत नाही. दिवसाकाठी 500 रुपये रोजगार असूनदेखील मजुर शेत शिवाराकडे फिरकत नाहीत. त्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे. मनुष्यबळाचा वापर कमी झाला असला तरी यांत्रिकिकणामुळे कष्ट कमी झाले तरी इंधन दरवाढीमुळे चाढ्यावर मूठ ठेवावी तरी कशी असा सवाल आहे.

Kharif Season : उत्पादन बेभरवश्याचे, वाढती महागाई अन् खर्च मात्र शाश्वत, सांगा शेती करायची कशी?
समाधानकारक पाऊस होऊनही खरिपाचा टक्का घसरला आहे.
Follow us on

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने (Kharif Sowing) खरीप पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. उत्पादनाच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून खरीप हंगाम महत्वाचा आहे. असे असताना यंदा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. (Fertilizer & Seed) खत-बियाणांच्या किंमतीमध्ये तर वाढ झालीच आहे पण (Fuel Rate) इंधन दरवाढीचाही थेट परिणाम शेती व्यवसयावर दिसून येतोय. खत-बियाणांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झाली असून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतल्याने उत्पादन पदरी पडो अथवा नाही पण एकरी 8 ते 10 हजार खर्ची करावे लागत आहेत. त्यामुळे चाढ्यावर मूठ महागाईची अशीच काहीशी स्थिती यंदा निर्माण झाली आहे. शिवाय खरीप हंगाम हा पावसावरच अवलंबून असतो. त्यामुळे उत्पादन जरी बेभरवश्याचे असले तरी वाढत्या खर्चातून शेतकऱ्यांची सुटका नाही.

खत-बियाणांच्या दरात वाढ

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी शेतकरी रासायिनक खतांचा वापर करतातच. त्यामुळे डीएपी खताची बॅग गतवर्षी 1 हजार 200 रुपये तर यंदा 1 हजार 350 रुपयांना मिळत आहे. 10:26:26 हे गतवर्षी 1 हजार 250 तर यंदा 1 हजार 470, 20:20:0:13 हे खत गेल्या वर्षी 1 हजार 200 तर आता 1 हजार 450, एमओपी हे खत गेल्यावर्षी 900 रुपयांना तर आता 1 हजार 700 रुपयांना मिळत आहे. एसएसपी हे गतवर्षी 330 तर यंदा 450 रुपयांना बॅग याप्रमाणे घ्यावे लागत आहे.सोयाबीन बियाणांच्या किंमतीमध्ये तब्बल 40 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच 30 किलो सोयाबीन बियाणाच्या मागे जवळपास 1 हजार 700 रुपये शेतकऱ्यांना अधिकचे मोजावे लागणार आहेत.

मजुरी अन् ट्रॅक्टर मशागतीचे दर गगणाला

शेतात राबल्याशिवाय काहीच पदरी पडत नाही हे वास्तव आहे. असे असताना शेती कामासाठी मजुरच मिळत नाही. दिवसाकाठी 500 रुपये रोजगार असूनदेखील मजुर शेत शिवाराकडे फिरकत नाहीत. त्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे. मनुष्यबळाचा वापर कमी झाला असला तरी यांत्रिकिकणामुळे कष्ट कमी झाले तरी इंधन दरवाढीमुळे चाढ्यावर मूठ ठेवावी तरी कशी असा सवाल आहे. शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

हे सुद्धा वाचा

अधिकचा खर्च पण ट्रॅक्टरवरच भर

शेती मशागतीपासून ते शेत माल बाजारात दाखल करण्यासाठी वाहनांचा वापर केला जात आहे. मशागतीमध्ये नांगरण, मोगडणी, कोळपणी, रोटरणे, पेरणी एवढेच नाही तर उगवण झालेल्या पिकाची मशागतही ट्रॅक्टरच्या सहायाने केली जात आहे. सुरवातीच्या काळात मोजकेच शेतकरी या अवजारांचा वापर करुन शेती करीत असे मात्र, काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे यंत्राच्या वापराशिवाय शेती अशक्य अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या मागणीमुळेच मशागतीसह इतराचे दर वाढलेले आहेत.