अर्धापूरच्या केळीला मागणी वाढली, मागणी वाढल्याने दरात तेजी; प्रति क्विंटल दोन हजारांचा भाव

| Updated on: May 27, 2022 | 8:34 AM

अर्धापूरच्या केळीला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरात देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या येथील केळीला क्विंटल मागे दोन हजारांचा भाव मिळत आहे.

अर्धापूरच्या केळीला मागणी वाढली, मागणी वाढल्याने दरात तेजी; प्रति क्विंटल दोन हजारांचा भाव
Follow us on

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूरच्या केळीला (Bananas) गेल्या चार वर्षांत प्रथमच प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय, चार वर्षांत दोन हजारांचा भाव पहिल्यांदा मिळाल्याने केळी उत्पादक चांगलेच सुखावले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तर केळीला प्रति क्विंटल सहाशे रुपयांचा भाव देखील मिळाला नव्हता. कोरोना (Corona) निर्बंध हटवण्यात आले. मात्र तरी देखील केळीला अपेक्षीत भाव मिळाला नाही. केळीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नव्हता. मात्र आता मागणी वाढल्याने केळीच्या दरात तेजी दिसून येत आहे. केळीला यंदा चांगला दर मिळत असल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. यंदा तरी केळीच्या पिकातून चांगले उत्पन्न हाती येईल अशी शेतकऱ्यांना अशा आहे.

परदेशात मोठी मागणी

विशेष म्हणजे अर्धापूरची केळी ही जगप्रसिद्ध आहेत. चविष्ठ आणि लवकर खराब न होणारी केळी अशी अर्धापूरच्या केळींची ख्याती आहे. त्यामुळे इथल्या केळीला भारतातच नाही तर अफगाणिस्तान, दुबई आणि तुर्कस्थान या देशातून चांगली मागणी आहे. दरवर्षी या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात केळी निर्यात केली जाते. यंदा केळीची मागणी सरासरीपेक्षा अधिक वाढल्याने केळींच्या दरात वाढ झाली आहे. देशाबाहेरील निर्यातीसोबतच अर्धापूरची केळी हे देशाच्या विविध शहरात देखील विक्रीसाठी पाठवली जातात. केळीचा दर्जा उच्च असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून देखील या केळीला मोठी मागणी असते.

हे सुद्धा वाचा

कोरोना काळात मोठा फटका

अर्धापूर परिसरात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील केळी या देशभरात प्रसिद्ध आहेत. येथील केळी त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे ओळखल्या जातात. मात्र गेले दोन वर्ष देशावर कोरोना संकट होते. कोरोना काळात बाजारपेठ ठप्प असल्याने केळीच्या मागणीत घट झाली. केळी हे जास्त दिवस ठेवता न येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना केळी मिळेल त्या भावात विकाव्या लागल्या. कोरोना काळात येथील केळीला क्विंटल मागे अवघा सहाशे रुपये भावा मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला. मात्र यंदा केळीला क्विंटल मागे तब्बल दोन हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षातील नुकसान यंदा भरून निघण्याची अपेक्षा आहे.