Sugarcane Harvesting : गळीत हंगाम जोमात तरीही फडातला ऊस ‘कोमात’, तोडणी रखडल्याने काय होते नुकसान?

गळीत हंगाम सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. राज्यात तब्बल 191 साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे गाळप होत असताना देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. कारखाना प्रशासनाचे नियोजन आणि मध्यंतरी पावसामुळे रखडलेली तोडणी यामुळे ऊसाचा कार्यकाळ संपूनही ऊस वावरातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Sugarcane Harvesting : गळीत हंगाम जोमात तरीही फडातला ऊस कोमात, तोडणी रखडल्याने काय होते नुकसान?
अतिरिक्त ऊसाला तुरे तर लागलेच आहे पण आता वाढत्या उन्हामुळे झपाट्याने वजनात घट होत आहे.
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 3:24 PM

लासलगाव : गळीत हंगाम सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. (Maharashtra) राज्यात तब्बल 191 साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे गाळप होत असताना देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. कारखाना प्रशासनाचे नियोजन आणि मध्यंतरी पावसामुळे रखडलेली तोडणी यामुळे ऊसाचा कार्यकाळ संपूनही ऊस वावरातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. (Nashik) नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठचा तब्बल 5 लाख टन ऊस अजूनही वावरातच आहे. तोडणी लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. शिवाय क्षेत्र रिकामे होत नसल्यामुळे इतर पिके शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. सध्या (Sugarcane) ऊसाला तुरे आले असून आता वजनात घट झाली तर केलेला खर्चही पदरात पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांचे नियोजन बिघडले असून आता शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. गोदाकाठच्या नदी लगतच्या शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांकडे नोंदी केल्या आहेत. त्यामुळे प्रश्न अधिकच बिकट होत आहे.

यामुळे रखडत आहे ऊसाची तोडणी

गोदाकाठचा ऊस एकाच वेळी तोडणीला आलेला आहे. शिवाय यंदा पावसामुळे यंत्राच्या सहाय्याने तोडणी शक्य नाही. त्यामुळे मजूराच्या सहायानेच ऊस तोडणी केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कारखान्याकडून वेळेवर मजूरांचा पूरवठा होत नाही. ऊसतोड कामगारांची कमतरता भासत असून वेळेवर मजूर येत नसल्याने उसाला तुरे फुटले आहे. यामुळे ऊसाचे वजन घटून नुकसान होणार असल्याने ऊस उत्पादकांचा झालेला खर्च देखील निघणे यामुळे मुश्कील होणार आहे. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

अतिरिक्त ऊसाची काय आहे स्थिती?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.

कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष

ऊस लागवडीच्या नोंदी ह्या साखर कारखान्याकडेही असतातच. मात्र, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कारखान्याचे संचालक हे लगतच्या भागातील शेतकऱ्यांचाच ऊसतोडणीला प्राधान्य देतात. लागवडीनंतर 12 महिन्यामध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. अन्यथा वजनाबरोबर साखरेच्या दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळेत तोड झाली तर शेतकऱ्यांचा फायदाही आहे आणि क्षेत्र रिकामे होऊन इतर पीकही घेता येते. मात्र, कारखाना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले

Latur Market : दीड महिन्यानंतर सोयाबीन उत्पादकांना दिलासा, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

लघू सिंचन प्रकल्पातील पाणी मुरतंय कुठं? ना शेती क्षेत्र ओलिताखाली ना प्रकल्पातून पाण्याची वहीवाट