तुरीचे दरही शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच अवलंबून, सोयाबीन-कापूस नंतर होणार का मोहीम फत्ते?

| Updated on: Jan 18, 2022 | 1:34 PM

आतापर्यंत बाजारपेठेत होत असलेल्या आवकबद्दल शेतकऱ्यांना फारसे सोईरसुतक नव्हते पण आता बाजरपेठेचे गणितच शेतकरी बांधू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागणीत कमी-अधिकपणा होऊनही गेल्या तीन महिन्यापासून सोयाबीनचे दर हे टिकून आहेत तर दुसरीकडे कापसाला गेल्या 50 वर्षातला विक्रमी दर मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाबाबत घेतलेली रणनिती तूर या पिकालाही लागू होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

तुरीचे दरही शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच अवलंबून, सोयाबीन-कापूस नंतर होणार का मोहीम फत्ते?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : यंदा कधी नव्हे ते शेतीमालाच्या दराबाबत (Farmer) शेतकऱ्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. आतापर्यंत बाजारपेठेत होत असलेल्या आवकबद्दल शेतकऱ्यांचे फारसे संबंध नव्हते पण आता बाजरपेठेचे गणितच शेतकरी बांधू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागणीत कमी-अधिकपणा होऊनही गेल्या तीन महिन्यापासून (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे टिकून आहेत तर दुसरीकडे कापसाला गेल्या 50 वर्षातला विक्रमी दर मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाबाबत घेतलेली रणनिती तूर या पिकालाही लागू होणार का हे पाहणे महत्वाचे आहे. कारण (tur inflow) तुरीची आवक सुरु झाली आहे. सध्या नवीन तुरीला हमी केंद्रावर जो दर ठरवून देण्यात आला आहे त्याप्रमाणेच दर मिळत आहे. दरात घसरण होताच गत आठवड्यात झालेल्या कमी आवकमुळे पुन्हा दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन कमी असताना अधिकचा लाभ कसा करुन घ्यावयाचा या प्रयोग तूर पिकावरही करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तुरीच्या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ

गेल्या 15 दिवसांपासून तुरीची आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीला 5 हजार 700 ते 6 हजार 300 पर्यंतचे दर राहिलेले होते. हमीभावापर्यंत तुरीच्या दराने मजल मारल्यानंतर मात्र, तुरीचे दर हे स्थिर राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूरीच्या दरात वाढ व्हावी या अपेक्षेने आवकवर नियंत्रण मिळवले. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाबाबत वेळोवेळी भूमिका बदलली त्याचप्रमाणे तुरीच्या बाबतीमध्येही केले आहे. त्यामुळे 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आता साठवणूक दारांकडून मागणी सुरु झाल्याने दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

यामुळे हमीभावाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

सध्या राज्यात नाफेडच्यावतीने 186 हमीभाव केंद्र उभारुन तूरीची खरेदी केली जात आहे. याकरिता 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करुन आता प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली आहे. शिवाय 6 हजार 300 चा दरही ठरविण्यात आला आहे. असे असतानाही शेतकरी या केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. कारण तूरीचे पीक हे अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने नुकसान झाले होते शिवाय पाण्यातही भिजले होते. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने ते खरेदी केंद्रावरील नियमात बसत नाही. शिवाय सध्या खुल्या बाजारपेठेतही हमीभावाप्रमाणेच किंवा त्यापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडेच विक्री करीत आहेत.

जुन्या तुरीला अधिकची मागणी

सध्या बाजारपेठेत नवी आणि जुनी अशा दोन्ही प्रकारच्या तुरीची आवक सुरु आहे. मात्र, दोन्हीच्या दरात 100 ते 200 रुपायांचा फरक आहे. कारण जुनी तुरीचे वाळवण व्यवस्थित झाले आहे. त्यामुळे त्याच्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे. पूर्ण क्षमतेने वाळलेल्या तूरीलाच अधिकची मागणी आहे. सध्या नव्या तुरीचा हंगाम जोमात सुरु झाला नसला तरी उत्पादनातील घटलेल्या प्रमाणामुळे अधिकचे दर मिळणारच या भूमिकेतून शेतकरी सावध भूमिका घेत आहेत. मात्र, आतापर्यंत केंद्र सरकारने केलेली आयात हाच दरवाढीमधला अडचणीचा मुद्दा ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

कहीं खुशी-कहीं गम : थंडीमुळे पीके कोमेजली, फळबागा बहरल्या, नेमका काय परिणाम झाला? वाचा सविस्तर

Crop Insurance: … अखेर कृषी विभागाचे भाकीत खरे ठरले, लातूरात असे काय घडले?

Soybean Rate: खरीप हंगामातील मुख्य पिकाच्या दरात मोठे बदल, काय आहे बाजारपेठेतले चित्र?