Kharif Season: खरीप हंगामाला महागाईच्या झळा, रासायनिक खताच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता

| Updated on: May 16, 2022 | 6:10 AM

गेल्या वर्षीपासून रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. हे कमी म्हणून की काय, रशिया-युक्रेन युध्दामुळे रासायनिक खताचा पुरवठा अनियमित झाला आहे. मागणीनुसार पुरवठा न झाल्यामुळे दरात वाढ ही निश्चित मानली जात आहे. केंद्राकडून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी स्थानिक पातळीवर दरवाढीचा सामना हा करावाच लागणार आहे.

Kharif Season: खरीप हंगामाला महागाईच्या झळा, रासायनिक खताच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता
रासायनिक खत
Follow us on

लातूर : खरीप हंगाम तोंडावर असतानाच दिवसेंदिवस नवनवीन समस्या समोर येत आहेत. यंदा मागणीनुसार (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा पुरवठा होतो का नाही याबाबत साशंका असतानाच आता (Pesticides) कीटकनाशक आणि तणनाशकांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ऐन वेळी उत्पादकांनी रासायनिक औषधे आणि तणनाशकाच्या दरामध्ये जवळपास दुपटीने वाढ केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक बेभरवश्याचे असले तरी (Kharif Sowing) पेरणीपूर्वी खतावर आणि कीटकनाशकावर खर्च हा ठरलेला आहे. या दरवाढीमुळे उत्पादन हे महागडे होणार आहे. वाढत्या महागाईवर राज्याने केंद्राकडे बोट दाखविले असले तरी यावरील करात सवलत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येतो मात्र, याकडे राज्याचेही दुर्लक्ष आहे.

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम

गेल्या वर्षीपासून रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. हे कमी म्हणून की काय, रशिया-युक्रेन युध्दामुळे रासायनिक खताचा पुरवठा अनियमित झाला आहे. मागणीनुसार पुरवठा न झाल्यामुळे दरात वाढ ही निश्चित मानली जात आहे. केंद्राकडून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी स्थानिक पातळीवर दरवाढीचा सामना हा करावाच लागणार आहे. तर दुसरीकडे रासायनिक खताबरोबर फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचे आणि तणनाशकाचे दर दुपटीने वाढले आहेत.त्यामुळे यंदा खरिपात महागाई सामना हा अटळ आहे.

असे वाढले आहेत कीटकनाशक आणि तणनाशकाचे दर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कीटकनाशक आणि तणनाशकाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. इमामेक्टीन बेंजोएट 100 ग्रॅम 380 रुपयांना होते ते आता 450 रुपयांवर पोहचले आहे. थायमोमॅझ 100 ग्रॅम 150 रुपयांना तर यंदा 300 रुपयांना झाले आहे. तर मॅन्कोझेब 100 ग्रॅम 330 रुपयांना होते ते यावर्षी 450 पर्यंत पोहचले आहे. तणनाशकामध्ये ग्लायफोसेट 41 टक्के 1 लिटर हे 380 रुपयाला होते ते आता 700 रुपयांवर गेले आहे. याच बरोबर विद्राव्य खतांचेही दर वाढले आहेत.

हे सुद्धा वाचा

बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे.शिवाय यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे पिकांची उगवण झाली की लागलीच फवारणीला सुरवात करावी लागते. उत्पादनापेक्षा तणनाशक आणि औषधावरच अधिकचा खर्च करावा लागत आहे. शिवाय खरिपातील पिकांचा कालावधी हा कमी असतो. त्यामुळे खरीप पिकांना खताची मात्रा दिल्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही.