केंद्र सरकारच्या तीन निर्णयानंतरही सोयाबीनच्या दरात वाढ, काय आहेत कारणे ?

| Updated on: Dec 28, 2021 | 11:37 AM

सोयाबीनचे दर कमी-जास्त झाले तरी शेतकऱ्यांनी आपली भूमिका ही सोडली नाही. गत आठवड्यात तर एकापाठोपाठ एक असे तीन निर्णय केंद्र सरकारने घेतले होते. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी होणार का असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी यामुळे पुन्हा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होत आहे.

केंद्र सरकारच्या तीन निर्णयानंतरही सोयाबीनच्या दरात वाढ, काय आहेत कारणे ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : सोयाबीनचे दर कमी-जास्त झाले तरी शेतकऱ्यांनी आपली भूमिका ही सोडली नाही. गत आठवड्यात तर एकापाठोपाठ एक असे तीन निर्णय (Centre government)केंद्र सरकारने घेतले होते. त्यामुळे (Soybean Rate) सोयाबीनचे दर कमी होणार का असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि (International Market) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी यामुळे पुन्हा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होत आहे. गतआठवड्यात 6 हजार 200 रुपयांनी सोयाबीन विकले गेले होते तर आता 6 हजार 600 रुपयांवर सोयाबीनचे दर गेलेले आहेत. बाजारातील तेजी आणि मागणीपेक्षा कमी आवक यामुळे पुन्हा सोयाबीनचे दर वाढत आहेत.

केंद्र सरकारचे ते 3 निर्णय

केंद्र सरकारचे निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसानच असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या अनुशंगाने खाद्यतेल आणि तेलबियांवर नियंत्रणासाठी सरकारने वायदेबंदीचा निर्णय घेतला होता. शिवाय रिफाइंड पामतेल आयातीच्या कालावधीत वाढ आणि सोयापेंडवर साठा मर्यादा लादण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात असे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अन्यथा गतआठवड्यात सातत्याने सोयाबीनच्या दरात घट होत होती किंवा दर हे स्थिर राहत होते. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान मानले जात आहे.

शेतकरी निर्णयावर ठामच, म्हणूनच बाजारात परिणाम

सोयाबीनच्या दरात वाढ होऊ अथवा घट मात्र, सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी यंदा केलेला आहे. आता दर घटले म्हणूनच नाही तर हंगामाच्या सुरवातीपासूनच हेच धोरण शेतकऱ्यांनी कायम ठेवलेले आहे. मागील आठवड्यात देशभर सोयाबीनची आवक ही 2 लाख 50 हजार पोत्यांची झाली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योगांकडून मागणी ही कायम राहिलेली आहे. यातच आवक कमी झाल्याने दरामध्ये हळूहळू का होईना सुधारणा होत आहे.

यामुळे सरकारच्या निर्णयाचा परिणाम दरावर नाही

केंद्र सरकारने मध्यंतरी सोयाबीनसाठी साठा मर्यादेचा नियम लावला होता. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता सोयापेंडच्या साठ्यावर मर्यादा लावण्यात आली आहे. उद्योगांना केवळ 90 दिवसांच्या क्षमतेएवढी मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगाकडे साठामर्यादेपेक्षा जास्त साठाच नाही. कारण सोयाबीनची आवक कमी आहे शिवाय दरही वाढलेले त्यामुळे या दराला कोणी साठा करण्याचे धाडसच करणार नाही. त्यामुळे सोयापेंड साठा मर्यादा निर्णयाचा परिणाम हा झालेला नाही.

सोयाबीनच्या दरात कशी झाली सुधारणा

गत आठवड्यात सोयाबीनची आवक कमी होऊनदेखील दरात कायम घसरण होती. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उठावच नव्हता. त्यामुळे प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीन 6 हजार 100 रुपयांवर येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय असा सवाल उपस्थित होऊ लागला होता. पण आता दरात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 300 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आवकही नियंत्रणात असल्याने हेच दर टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीच कमी केली. त्यामुळेच हा बदल पाहवयास मिळाला.

संबंधित बातम्या :

सब्र का फल मीठा होता है..! शेतकऱ्यांच्या एका निर्णयामुळे बदलले कापूस खरेदी केंद्रावरील चित्र

शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी