Pune Drown : हृदयद्रावक… पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात 7 जणांचा बुडून मृत्यू, दोघींचा शोध सुरु! भाटघर आणि चास कमान धरणावरील घटना
पुणे जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील भोरच्या भाटघर धरण आणि खेड तालुक्यातील चास कमान धरणावर ही दु:खद घटना घडली आहे. मृत सर्वजण 16 ते 23 वयामधील विद्यार्थी होते.
पुणे : जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील भोरच्या भाटघर धरण (Bhatghar Dam) आणि खेड तालुक्यातील चास कमान धरणावर (Chas Kaman Dam) ही दु:खद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाटघर धरणावर 5 तरुणी गेल्या होत्या. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या धरणातील पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य (Search Operation) सुरु करण्यात आलं. हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 तरुणींचा मृतदेह सापडला असून, अद्याप दोन तरुणींचा शोध सुरु आहे.
भाटघर धरणात बुडालेल्या पाचही तरुणी हडपसरच्या रहिवासी होत्या. त्या सर्वजणी भाटघर धरणावर फिरण्यासाठी आल्या होत्या. मात्र, खोल पाण्यात गेल्यामुळे त्या धरणात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांनी शोधकार्य सुरु केलं. तीन तरुणींचे मृतदेह हाती लागले असून दोघींचा शोध अजून सुरु आहे. तरुणींच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच ते भाटघर धरणावर दाखल झाले. त्यावेळी त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
बुडालेल्या तरुणींची नावे
खुशबू लंकेश रजपूत (वय 19) मनिषा लखन रजपूत (वय 20) चांदणी शक्ती रजपूत (वय 21) पूनम संदीप रजपूत (वय 22) मोनिका रोहित चव्हाण (वय 23)
खेडच्या चास कमान धरणात 4 विद्यार्थी बुडाले
दुसऱ्या घटनेत पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणात पोहायला गेलेल्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यात दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींचा समावेश होता. हे विद्यार्थी सह्याद्री स्कूलचे होते. गुंडाळवाडी येथील तिवई हिल परिसरात सह्याद्री स्कूल आहे. या ठिकाणी निवासी विद्यार्थी असतात. उद्या शाळेला सुट्टी लागणार असल्याने 10 वी च्या वर्गात शिकणारे चौघे तिवई हिलच्या पायथ्याशी असलेल्या चास कमान धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या लाटेसोबत ते पाण्यात बुडाले. परिक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिशा देसाई आणि नव्या भोसले असं या विद्यार्थ्यांची नावं होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, चौघांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले.