नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, 43 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यात आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी आहेत. तर 24 लोक बेपत्ता झालेत.
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यात आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी आहेत. तर 24 लोक बेपत्ता झालेत. नेपाळच्या पूर्वेकडील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळमधील अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुसळधार पावसामुळे नेपाळमधील अनेक शहरात पाणी साचलं आहे. काठमांडूमध्येही पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्या आणि बेपत्ता झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
नेपाळमध्ये आलेल्या पूराचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी 2008 मध्ये अशाप्रकारे कोसी नदीच्या पातळीत वाढ झाली होती. त्यावेळी नदीने सर्व बांध तोडून आपला रस्ता बदलला होता. यामुळे बिहारमध्ये महापूर आला होता. या पूराचा फटका 20 लाख लोकांना बसला होता. त्यात 500 लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेवर कोसी नदी किनारी बचाव दलाला तैनात करण्यात आलं आहे. यामुळे हवामान खात्याने स्थानिक लोकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच येत्या आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.