खाद्यतेलापाठोपाठ फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले

| Updated on: May 11, 2021 | 8:58 AM

लॉकडाऊनमुळे देशातील 60 टक्क्यांहून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) अर्थात मंडई बंद आहेत. यामुळे शेतकर्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Along with cooking oil, prices of fruits and vegetables also hike)

खाद्यतेलापाठोपाठ फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले
Vegetables
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोना फैलावाचे टेन्शन कायम आहे. कोरोनाची रुग्णसंख्या मधेच आटोक्यात येत आहे. मात्र काही दिवसांच्या फरकानंतर पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देशवासियांना आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे लोक उत्तम आहार, फळे, भाज्या खाण्याकडे वळू लागले आहेत. मात्र आता खाद्यतेलापाठोपाठ फळे आणि भाज्यांचेही भाव वाढल्याने नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. लोक आधीच रिफाईन्ड तेलाच्या दरवाढीने त्रस्त आहेत. त्यात आता फळे-भाज्यांची दरवाढ झाली आहे. दुसरीकडे कोरोना लॉकडाऊनदेखील फळे-भाज्यांच्या दरवाढीमागील एक कारण आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 60 टक्क्यांहून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) अर्थात मंडई बंद आहेत. यामुळे शेतकर्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Along with cooking oil, prices of fruits and vegetables also hike)

देशभरात फळे आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ

सीएनबीसी आवाजच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊनमुळे देशभरात फळे आणि भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. मंडई अर्थात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहिल्यामुळे शेतकर्यांची उत्पादने बाजारापर्यंत पोहोचत नाहीत. याच कारणामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. फळे आणि भाज्यांची खूप कमी प्रमाणात आवक होत आहे. त्याचा थेट परिणाम फळे-भाज्यांच्या किंमतीवर दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे फळे-भाज्यांची वाहतूक करणे मु्श्किल

जाणकारांच्या मते, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू केले आहेत. ज्या ठिकाणी काही प्रमाणात मंडई सुरू आहेत, तेथे मर्यादित स्वरुपात फळे-भाज्यांची आवक होत आहे. कोरोनामुळे व्यापारीही फळे-भाज्यांच्या व्यवसायात तितकीशी रुची दाखवत नसल्याचे भाजी मार्केटशी संबंधित जाणकारांचे मत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपेक्षा यंदाच्या लॉकडाऊनमध्ये फळे-भाज्यांच्या आवकवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन काळात काही कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. लॉकडाऊनचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक पूर्वीप्रमाणे होत नसल्यामुळे शेतात लागवड केलेल्या भाज्या आणि फळांची कृषी उत्पन्न बाजार समित्यांपर्यंत वाहतूक करणे मुश्किल झाले आहेत.

मार्चमध्ये फळे आणि भाज्यांची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक होती. बदललेल्या परिस्थितीचा थेट ग्राहकांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. देशात मे आणि जून महिन्यात आंशिक लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दिवसांत फळे आणि भाज्यांच्या किंमती चढ्याच राहण्याचा अंदाज मार्केट तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकांना खाद्यतेलाबरोबरच फळे-भाज्यांच्या दरवाढीपासून सध्यातरी दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहेत. (Along with cooking oil, prices of fruits and vegetables also hike)

इतर बातम्या

भारतातील ‘या’ लोकप्रिय Hyundai कारचे फीचर्स कमी होणार, कंपनीचा मोठा निर्णय

एचडीएफसी बँक देशातील प्रत्येक गावागावात पोहोचणार, पण कसे ते जाणून घ्या…