जून महिन्यात पतीची आत्महत्या, जुलैमध्ये पत्नीने स्वत:सह दोन मुलींना विष पाजलं
पालघरमध्ये गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. ही घटना जव्हार तालुक्यातील खरोंडा या गावातील आहे. जूनमध्ये गरिबीला कंटाळलेल्या नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती.
पालघर : गेल्या महिन्यात घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या पत्नीने दोन मुलींसह विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एक मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी मुलगी गंभीर आहे. तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुक्षणा हांडवाने असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. जव्हार तालुक्यातील खरोंडा गावात ही धक्कादायक घटना घडली. रुक्षणा यांच्या पतीने गेल्या महिन्यातच गरिबीला कंटाळून आत्महत्या केली होती.
पतीच्या निधनाने हतबल झालेल्या रुक्षणा यांनी घर कसं चालवायचं, मुलांचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून दोन मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये 7 महिन्याची वृषाली वाचली. तर रुक्षणा आणि 3 वर्षीय दीपालीचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारातून बचावलेली 7 महिन्यांची वृषाली मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. यापूर्वीही येथे कुपोषितपणामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. यावर आळा घालण्यासाठी सरकारकडूनही अनेक उपक्रम या भागात राबवले जात आहेत. पण आजही अशी अनेक कुटुंबं आहेत ज्यांना दोन वेळेचे जेवणही मिळणं मुश्कील झालं आहे.