तिसऱ्या देशाची लुडबूड नको, काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ

| Updated on: Aug 23, 2019 | 10:34 AM

"काश्मीरप्रश्नी कोणत्याही अन्य देशाला या प्रकरणी मध्यस्थी करण्याची गरज नाही. केवळ भारत आणि पाकिस्तान दोनच देश तोडगा काढू शकतात"

तिसऱ्या देशाची लुडबूड नको, काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ
Follow us on

नवी दिल्ली :  फ्रान्सने काश्मीरप्रश्नी भारताची बाजू घेतली आहे. फ्रान्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर दोघांनी संयुक्तपणे संबोधन केलं. यावेळी मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी काश्मीरप्रश्नी कोणत्याही अन्य देशाला या प्रकरणी मध्यस्थी करण्याची गरज नाही. केवळ भारत आणि पाकिस्तान दोनच देश तोडगा काढू शकतात, असं म्हटलं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वेळा मध्यस्थीसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. मात्र भारताने आम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांकडून पाठिंबा मिळत आहे.

तिसऱ्या देशाची गरज नाही

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याची माहिती दिली. हा मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी त्यांना काश्मीरप्रकरणी भारत आणि पाकिस्तान या दोनच देशांनी तोडगा काढावा, अन्य देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचं सांगितलं”

याशिवाय आपण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही चर्चा करुन, हा प्रश्न दोन्ही पक्षांनीच सोडवायला हवा, जेणेकरुन कुठेही दहशतवादी घटना घडू नयेत, असंही मॅक्रॉन म्हणाले.

पंतप्रधान मोदींचं कौतुक

मॅक्रॉन यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. “मोदी पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने जिंकून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते बनले. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. या विजयावरुन भारताची लोकशाही किती मजबूत आहे हे दिसून येतं”, असं मॅक्रॉन म्हणाले.

फ्रान्स आणि भारत विश्वासू मित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी फ्रान्स आणि भारत हे विश्वासू मित्र आहे. कोणत्याही स्वार्थामुळे नव्हे तर विश्वासाने दोन्ही देशातील नातं दृढ झालं आहे, असं मोदी म्हणाले. दोन्ही देश सातत्याने दहशतवादाचा सामना करत आहेत. दहशतवादाविरोधात एक होणं हेच आमचं ध्येय आहे, असं मोदींनी नमूद केलं.