मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा ‘कलंक’ गेल्या 17 एप्रिलला प्रदर्शित झाला. मात्र, हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला. प्रदर्शनापूर्वी ज्याप्रकारे या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं, त्यावरुन हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल, असं वाटत होतं. मात्र, हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला. इतकी मोठी आणि प्रसिद्ध स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्यात अपयशी ठरला. ‘कलंक’ हा सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप ठरल्याने सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि करण जोहर यांच्यातील नात्यांमध्ये कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.
अभिषेक वर्मन यांच्या खराब दिग्दर्शनामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला, यामुळे करण जोहर हे अभिषेक वर्मनवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आमच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी नसून, ही केवळ अफवा असल्याचं करणने स्पष्ट केलं. ‘कलंक’ला प्रेक्षकांनी तुटपुंजा प्रतिसाद दिला. त्यामुळे अभिषेक वर्मन हे नाराज होते. त्यावर करण जोहरने नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत अभिषेक वर्मन यांना धीर दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनुसार, “अभिषेक वर्मन यांनी ‘कलंक’ सिनेमापूर्वी ‘2 स्टेट्स’ हा यशस्वी सिनेमा बनवला आहे. त्यामुळे ‘कलंक’ जरी फ्लॉप ठरला असला, तरी त्यांचा ग्राफ संतुलित आहे. त्यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही”, असं करणने म्हटलं. तसेच, त्यांनी आता नव्या स्क्रिप्टवर काम करावं असा सल्लाही करणने अभिषेक वर्मन यांना दिला.
‘कलंक’ हा सिनेमा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, माधूरी दिक्षित, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि कुणाल खेमू यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमात 20 वर्षांनंतर माधूरी दिक्षित आणि संजय दत्त यांची जोडी पाहायला मिळाली. या सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ‘कलंक’ हा सिनेमा करण जोहरचा ड्रीम प्रोजोक्ट होता. 15 वर्षांपूर्वी त्याचे पिता दिग्दर्शक यश जोहर यांनी हा सिनेमा बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं.
संबंधित बातम्या :
पहिल्याच दिवशी कलंक चित्रपटाची कमाई तब्बल…
माधुरी-आलियाच्या दिलखेच अदा, ‘कलंक’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज