अतिवृष्टीग्रस्तांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आजच बैठक घेणार, अजितदादाही बैठकीला उपस्थित राहणार

| Updated on: Oct 23, 2020 | 12:19 PM

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. | Cabinet Meeting

अतिवृष्टीग्रस्तांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आजच बैठक घेणार, अजितदादाही बैठकीला उपस्थित राहणार
Follow us on

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे वारंवार लांबणीवर पडत असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आजच पार पडणार आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दाखवले होते. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. ही बैठक गुरुवारीच होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ही बैठक काल आणि आज रद्द करण्यात आली होती. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न सरकारला विचारला गेल्यास अजित पवार यांच्या प्रकृतीचे कारण दिले जात होते. मात्र, ‘टीव्ही 9 मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दाखवल्यानंतर ही बैठक आजच पार पडणार आहे. या बैठकीला अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे कळते. (Maharashtra cabinet meeting for Rain affected areas and farmers package aid)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन दिले होते. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार असं सांगण्यात आले. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता होती.

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून तब्बल तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या:

केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

थिल्लर-चिल्लरकडे बघायला वेळ नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

(Maharashtra cabinet meeting for Rain affected areas and farmers package aid)