उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा

| Updated on: Oct 27, 2020 | 12:12 AM

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने फळबाग नुकसानीची अजब पंचनामा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केलाय.

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा
Follow us on

उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाने फळबाग नुकसानीचा अजब पंचनामा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याच्या फळबागांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले नाही असा अहवाल कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने त्यांचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात केळी, द्राक्षे, पपई, डाळिंब, मोसंबी, सीताफळ, लिंबू, चिकू या पिकांचे एक एकरही नुकसान झाले नसल्याचा पंचनामा सादर केला आहे. (Zero percent loss of orchards in Osmanabad taluka)

तुळजापूर तालुक्यात केळी, डाळिंब, मोसंबी, सीताफळ, लिंबू, चिकू या पिकांचे एक एकरही नुकसान नाही तर उमरगा, लोहारा, भूम, परंडा, कळंब आणि वाशी तालुक्यातही अत्यल्प नुकसान झाल्याचे प्रशासनाने दाखविले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 6,230 फळबाग शेतकऱ्यांचे 3 हजार 193 हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान दाखविण्यात आले असून 18 हजार प्रमाणे 5 कोटी 74 लाख रुपयांचे नुकसान भरपाईच्या निधीची मागणी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेला लेखी अहवालात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी या भागाची नुकसानीची पाहणी केली होती. सरकारमधील मंत्र्यांना नुकसान दिसले मात्र अधिकऱ्यांना पावसाने झालेले नुकसान दिसले नाही असाच काही प्रकार समोर आल्याने अजब तुझे सरकार असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महसूल व कृषी विभागाचे गजब पंचनामे सादर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना वाली कोण? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र यावर गप्प आहेत.

शेतजमिनीवर 3 इंचापेक्षा अधिक जाडीचा गाळ साचल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील एक एकरही क्षेत्र बाधित झाले नसल्याचा अहवाल दिला उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिला आहे. तर 6 हजार 693 शेतकऱ्यांच्या 3 हजार 165 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन वाहून गेल्याचे म्हटले आहे. यासाठी 11 कोटी 86 लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार 3 हजार 165 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन वाहून गेली आहे. मात्र या जमिनीवरील माती किंवा गाळ कोठेही साचला नाही असेच म्हणावे लागेल.

एकीकडे अतिवृष्टीमुळे गुडघाभर चिखल व पाणी साचल्याने वास्तव चित्र आहे. पाण्याने वाहून गेलेल्या शेतीची माती व गाळ थेट ओढे, नदी पात्रात शिस्तीत गेला की अन्य कुठे गेला ? हा या निमित्ताने संशोधनाचा विषय ठरत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून वाहून गेलेला गाळ पद्धतशीरपणे जिरवला अशी टीका आता सर्वसामान्यांच्यामधून केली जात आहे. शेती वाहून गेल्याच्या व गाळाच्या पंचनाम्याने प्रशासनासोबतच सरकारची देखील पोलखोल झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे संयुक्त पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या पथकाने केले. त्यात 33 टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र बाधित म्हणजे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आले. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात फळबागांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल प्रशासनाने सादर केला आहे. उस्मानाबाद तालुक्यात 1 लाख 1 हजार 876 हेक्टर इतके पेरणी योग्य फळबाग लागवड क्षेत्र असून त्यापैकी 1 लाख 18 हजार 695 हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड झाली आहे. मात्र त्यापैकी एकही एकर फळबागेचे 33 टक्क्यापेक्षा नुकसान झाले नसल्याचा पंचनामा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

उस्मानाबाद तालुक्यात एकही फळबाग लागवड शेतकऱ्याचे नुकसान झाले नसल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. तुळजापूर तालुक्यात 1 हजार 843 फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे 1 हजार 350 हेक्टर द्राक्षबागेचे तर 150 हेक्टर पपई क्षेत्राचे नुकसान झाल्याच्या अहवाल दिला आहे.

उमरगा तालुक्यात 113 शेतकऱ्यांचे 30 एकर केळी, 9 हेक्टर पपई व 4 हेक्टर डाळिंब बागेचे नुकसान दाखवण्यात आले आहे. तर उमरगा तालुक्यात द्राक्ष, मोसंबी, सीताफळ, लिंबू यांचे एक हेक्टरही नुकसान झाले नाही. लोहारा तालुक्यात 235 शेतकऱ्यांचे 19 हेक्टर केळी तर 13 हेक्टर पपईचे नुकसान दाखवण्यात आले आहे. भूम तालुक्यात 425 शेतकऱ्यांचे 108 क्षेत्रावरील केळी व 12 हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंबाचे नुकसान दाखवण्यात आले आहे.

परंडा तालुक्यात सर्वाधिक 3 हजार 506 शेतकऱ्यांचे 90 हेक्टर केळी, 63 हेक्टर द्राक्ष, 360 हेक्टर पपई, 85 हेक्टर डाळिंब, 35 हेक्‍टर मोसंबी, 260 हेक्टर सिताफळ, 276 हेक्टर लिंबू व 12 हेक्टर चिकू बागेचे नुकसान दाखवण्यात आले आहे. कळंब तालुक्यात 72 शेतकऱ्यांचे 46 हेक्टर तर वाशी तालुक्यात 36 शेतकऱ्यांचे 17 हेकटर क्षेत्र 33 टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र बाधित दाखवण्यात आले आहे.

33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास ते क्षेत्र नुकसानीस पात्र समजण्यात येते असे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचा हवाला देत सांगितले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार उस्मानाबाद तालुक्यात एक हेक्टरही कापुस, मका, ऊस, भाजीपाला क्षेत्राचे नुकसान झालेले नाही तर तुळजापूर तालुक्यातही स्तिथी सारखीच आहे.

उस्मानाबाद तालुक्यात केवळ 152 शेतकऱ्यांची 64 हेक्टर तर तुळजापूर तालुक्यात 4 हजार 714 शेतकऱ्यांची 1 हजार 935 हेकटर शेती वाहून गेली. उमरगा तालुक्यात 863 शेतकऱ्यांची 354 हेक्टर, लोहारा तालुक्यात 740 शेतकऱ्यांची 680 हेक्टर, भूम तालुक्यात 48 शेतकऱ्यांची 35 हेक्टर तर परंडा तालुक्यात 176 शेतकऱ्यांची 97 हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांच्या सहीने सादर केला आहे, विशेष म्हणजे कळंब व वाशी तालुक्यात एक एकरही शेती वाहून गेली नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ वगळता सत्ताधारी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले, डॉ. तानाजीराव सावंत व कैलास पाटील हे 3 आमदार असून सेना खासदार ओमराजे निंबाळकर हे आहेत तर पालकमंत्री शंकरराव गडाख हेही सेनेचे आहेत. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री असतानाही शेतकऱ्यांवर खुलेआम अन्याय होत आहे मात्र यावर एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांसह या लोकप्रतिनिधींनी नुकसान पाहणी दौरा केला असतानाही अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून असे गोलमाल अहवाल सादर केले हा प्रश्न विचारला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही प्रशासनाचा अश्या स्वरूपाच्या पंचनामा अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करा, उस्मानाबाद शिवसेना मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा