औरंगाबादः शहरातील काबरा महाविद्यालयातील (Kabra Collage) परीक्षा केंद्रात (Exam Center)गोंधळ उडाल्याने येथील केंद्राची मान्यता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. एकाच बेंचवर चक्क तीन-तीन विद्यार्थी परीक्षेला बसवण्यात आल्याने परीक्षार्थींचा (Students) एकच गोंधळ उडाला होता. बीएससी, बायोटेक, बीएससी आयटी या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला. एकाच बाकावर अत्यंत दाटीवाटीनं विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने त्यांचा संताप झाला. गंभीर बाब म्हणजे कॉलेजच्या स्टोअररुममध्येच विद्यार्थ्यांसाठी बेंच टाकून देण्यात आले होते. तेथेही एका बाकावर तिघांना बसवल्याने विद्यार्थ्यांनी कशी बशी परीक्षा पार पाडली. औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधील या प्रकाराची चर्चा आज औरंगाबादेत सकाळपासून सुरु आहे. अखेर विद्यापीठाकडून कॉलेजवर कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील प्र कुलगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रात गोंधळ उडाल्याने संबंधित परीक्षा केंद्र तात्पुरती स्थगिती दिली आहे. सदर विद्यार्थ्यांना इतरत्र वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्यापासून ज्या परीक्षा आहेत, त्यात कोणताही गोंधळ होणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुविधेच्या दृष्टीकोनातून ते योग्य राहिल, याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान परीक्षा काळात गोंधळ उडाल्यामुळे काबरा कॉलेजमधील परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठांकडून परीक्षार्थींची इतर ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. विद्यापीठाच्या प्र कुलगुरुंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘ मी स्वतः परीक्षा केंद्रात जाऊन तेथील पाहणी केली. परीक्षा संचालकांना याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे. संबंधित परीक्षाकेंद्राचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडूनही अहवाल मागवण्यात आला आहे. या दोन्ही अहवालानंतर जे गैरव्यवस्थापन झालं, त्याचं कारण सापडेल. त्यानुसार, जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
औरंगाबादमधील काबरा कॉलेजमध्ये घडलेली ही घटना आणि परीक्षेतील गोंधळ ही अक्षम्य चूक असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसेच झाल्या प्रकारात विद्यार्थ्यांची चूक नसून त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली होती. एकाच बाकावर बसून तिघांना परीक्षा द्यावी लागल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात आला होता. मात्र असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची काळजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणार असल्याचं, आश्वासन प्र कुलगुरूंनी दिलंय.