Aurangabad | 10 हजार कोटींत 500 च्या 4 नोटा कमी, परत द्या, नाहीतर ईडीकडे तक्रार करू, पैसेवाटप आरोपावर खा. जलील यांच्याकडून खैरेंची खिल्ली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर औरंगाबाद शहराला पाणी देण्याची तारीख सांगितली तर आम्ही त्यांचं जाहीर स्वागत करू. ते ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावर फुलांची उधळण करू, असं वक्तव्य खासदार जलील यांनी केलं आहे.

Aurangabad | 10 हजार कोटींत 500 च्या 4 नोटा कमी, परत द्या, नाहीतर ईडीकडे तक्रार करू, पैसेवाटप आरोपावर खा. जलील यांच्याकडून खैरेंची खिल्ली
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 01, 2022 | 2:08 PM

औरंगाबादः एमआयएम (MIM) आणि वंचित आघाडीला भाजपने एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील  (Imtiaz Jaleel)यांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. आम्हाला एक हजार कोटी रुपये नाही तर दहा हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे स्वतः चंद्रकांत खैरे यांनीच आणून दिले होते आणि त्यात 500 च्या चार नोटा कमी आल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांनी चहा पाण्यासाठी त्या ठेवून घेतल्या होत्या. त्यांनी त्या अजून परत नाही केल्या. त्यामुळे त्यांनी त्या परत कराव्यात, अन्यथा आम्ही ईडीकडे तक्रार करू, असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. तसेच पैसे दिल्याची काही माहिती खैरेंकडे असेल तर त्यांनी ईडीकडे तक्रार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

‘उद्धव ठाकरे पाणी देऊ शकणार नाहीत’

येत्या 8 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र शहरात प्रमुख समस्या पाण्याची आहे. उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराला पाणी देऊ शकणार नाहीत, त्यामुळे ते पुन्हा औरंगाबादला येऊन धर्माचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला महान पुरुषांचं नाव देत आहेत, त्या शहराला 10 दिवसांनी पाणी मिळतं, याचा विचार करत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

‘… तर फुलांची मुख्यमंत्र्यांवर फुलांची उधळण करू’

शहरातील पाणी समस्येवरून खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर औरंगाबाद शहराला पाणी देण्याची तारीख सांगितली तर आम्ही त्यांचं जाहीर स्वागत करू. ते ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावर फुलांची उधळण करू, असं वक्तव्य खासदार जलील यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या वतीनं स्तंभपूजन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला आठ दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्यक्ष तयारीला सुरुवात म्हणून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सभेच्या ठिकाणी आज स्तंभ पूजन करण्यात आले. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाववर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या हस्ते आज विधीवत स्तंभपूजन करण्यात आलं.

Follow Us