औरंगाबादः शहरातील पेटलेला पाणी प्रश्न (Water issue) सोडवण्यासाठी मनपा प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आले आहे. विविध ठिकाणची पाणीगळती आणि अवैध नळजोडण्यांवरही महापालिकेची करडी नजर आहे. गेल्या काही दिवसात मनपाने केलेल्या निरीक्षणानुसार, शहरात तब्बल 1 लाख 25 हजार अवैध नळजोडणी (Illegal water connection) असल्याचं समोर आलं आहे. शहरातील आणखी ठिकाणी अशा प्रकारे अवैध नळांचे कनेक्शन घेतेले आहेत, याच्या सर्वेक्षणासाठी मनपाने आठ दिवसांची मुदतवाढ घेतली आहे. यानंतर अवैध नळ घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय ,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि मनपा अभियंत्यांसोबत एक बैठक घेतली होती. यावेळी मनपाच्या वतीने शहरातील पाणी प्रश्वावर सुरु असलेल्या उपाय योजनांविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर आता मनपाने अवैध नळजोडणीवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी महापालिकेने अवैध नळतोडणीची मोहिम थांबवी होती. आता ही सभा संपल्यानंतर मनपा पुन्हा अॅक्शन मोडवर आली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील उद्भवलेल्या पाणी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेत सर्व विभाग प्रमुखांना पाणी पुरवठा बाबत विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. प्रत्येक झोनसाठी एक पालक अधिकारी असे नऊ पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय, वाहूळे यांना जलवहिनी वरील नळांची तपासणी करून अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे, असे नळ खंडित करून पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे, अशी अनधिकृत नळ जोडणी करणारे प्लंबर यांच्यावर गुन्हे दाखल करणे, नवीन अनधिकृत नळ जोडण्या होणार नाहीत याची दक्षता घेणे व नियोजन करणे ही जबाबदारी प्रशासक महोदयांनी दिली आहे.
शहरातील अमृत प्लाझा (हमलवाडा)व सिल्क मिल कॉलनी भागात सुमारे 23 अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढले. या अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदरील अनधिकृत जोडण्या खंडित करून सदर नळ कनेक्शन घेणारे आणि जोडून देणारे प्लंबर यांच्या वर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अभियंत्यांनी दिली आहे.