अश्रूंचा बांध फुटला, ‘तो’ कृषीमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला, बळीराजाचा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

| Updated on: Apr 10, 2023 | 7:17 PM

महाराष्ट्रात शेतीच्या बांधावर अवकाळी पावसामुळे हाहाकार उडालाय. गारपीटीमुळे होतं नव्हतं ती सारी पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी पीकं पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला धीर देणं फार महत्त्वाचं आहे.

अश्रूंचा बांध फुटला, तो कृषीमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला, बळीराजाचा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Follow us on

बुलढाणा : आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. शेतकरी सुखी राहिला तर देश आणि जग सुखी राहील असं आपण मानतो. जय जवान जय किसान अशा ब्रीदवाक्याचा वारंवार नेतेमंडळींकडून उल्लेख केला जातो. पण या शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आलेली. खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांना फोनवरुन धीर दिला तेव्हा त्या शेतकऱ्याला रडू कोसळल्याची बातमी समोर आली. ही बातमी ताजी असतानाच बुलढाण्यातून अशीच एक बातमी समोर आली. शेतीचं झालेल्या नुकसानीची पाहणी करायला गेलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर एका शेतकऱ्याचा संयमाचा बांध फुटला. तो कृषीमंत्र्यासमोर अक्षरश: ओक्साबोक्शी रडला. त्याचं ते रडणं कॅमेऱ्यात कैद झालंय. त्या क्षणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही डोळे पाणावतील, इतकं भयानक हे वास्तव आहे.

खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आज कोणत्या संकटाला सामोरं जातोय, किती संघर्ष सोसतोय, याची कल्पना आपण किंचितही करु शकणार नाही. महाराष्ट्रात शेतीच्या बांधावर अवकाळी पावसामुळे हाहाकार उडालाय. गारपीटीमुळे होतं नव्हतं ती सारी पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी पीकं पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला धीर देणं फार महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणं जास्त आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचं दृश्य आज कृषीमंत्र्यांच्या बुलढाणा दौऱ्यातून उघडपणे झालंय.

बुलढाण्यातील खामगावमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोरच एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. हा शेतकरी इतका ढसाढसा रडत होता की त्याला आवरणं कृषीमंत्र्यांना अवघड झालं. इतर शेतकरी या शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण शेतकरी स्वत:च्या डोळ्यांमध्ये येणाऱ्या अश्रूंना रोखू शकत नव्हता. तो इतका ओक्शाबोक्शी रडत होता की तिथे असलेल्या प्रत्येकाचे काळजाचे ठोके चुकले. हा शेतकरी रडत-रडत आपल्या शेतीचं झालेल्या नुकसानीची माहिती अब्दुल सत्तार यांना देत होता.

हे सुद्धा वाचा

अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर गेले तेव्हा तिथे 15 ते 20 शेतकरी होते. यावेळी एक शेतकरी रोषात ओरडताना दिसला. आठ दिवस झाले, सरकारचा प्रतिनिधी कुणीच आला नाही, अशी तक्रार त्याने केली. यावेळी इतर शेतकरी देखील आक्रमक झाले. शेतीचं नुकसान होऊन आठ दिवस झाले तरी सरकारकडून कुणीही विचारपूस करायला आले नाही, असा आक्रोश शेतकरी करत होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी इतर शेतकऱ्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. “हे बघा इतके सगळे बोलू लागले आहेत. ज्याचं नुकसान झालंय त्यालाच बोलू द्या. मध्यंतरी कुणी बोलू नका. हा शेतकरी बोलू लागला आहे. त्याला बोलू द्या. मध्ये कुणी बोलू नका”, असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं.

अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांना तंबी

एका शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये आलेले अश्रू आणि आक्रमक झालेले इतर शेतकरी हे पाहून अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. “तहसीलदार असाल, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक असाल, तलाटी असाल यांनी प्रत्येक गाव, शेतामध्ये जावून पंचनामे करुन वस्तुनिष्ट पुरावे सादर करावे. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यावी. तुम्हाला नुकसान परभाई देण्याचा अधिकार नाही. पण शेतकऱ्यांचे पंचनामे कुणी लपवले किंवा बेजबाबदारपणे काम केलं तर त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल”, अशी तंबी अब्दुल सत्तार यांनी दिली.