बुलडाणा : सध्या अतिवृष्टीमुळे पिके सुकू लागलीत. पाण्याखाली आल्यानं पिवळी पडू लागलीत. या आसमानी, सुलतानी संकटाला तोंड देत आहेत. अशातच वन्यप्राणींकडून (wildlife) मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकांचे होते आहे. पीक चांगले बहरले असताना शेतकऱ्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी शेतात जावे लागते. नीलगाईंपासून (Nilgai) आपली पीक वाचावी. म्हणून चक्क एका शेतकऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच थेट फोन लावला. आपली समस्या मांडली. सध्या मुख्यमंत्री आणि हा शेतकरी यांच्या संभाषणाची (conversation) ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. उद्धव नावाच्या शेतकऱ्यानं मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला. यामुळं हे उद्धव हे चर्चेत आले. त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली. यामुळं हे शेतकरी चर्चेत आलेत.
बुलडाणा जिल्ह्यातल्या वाकी बुद्रुक, बायगाव, मेंडगाव, पिप्रीआंधळे, अंढेरा सेवानगर, धोत्रा नंदई, वाकी खुर्द, डोद्रा, अंचरवाडी या गावाजवळ वनविभागाचे जंगल आहे. या जंगलात 500 च्यावर नीलगायी आहेत. या जंगलाशेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन, कपाशी, तूर, मकासह अनेक पीक बहरत आहेत. असे असताना नीलगायींचा कळप शेतात येतो. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतोय. या नीलगाय प्राण्याचे खाणे कमी मात्र नुकसान जास्त असल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यांचे मोठे नुकसान हे वन्यप्राणी करत आहेत. हजारो हेक्टरवरील पीक या प्राण्यांनी नष्ट केलीत. वनविभाग काहीच करत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हे प्राणी हिरावतात. चक्क वाकी बु. येथील शेतकरी उद्धव राजे नागरे यांनी काल रात्री 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन केला. आपल्या शेतातून पिकांचे वन्य प्राण्यापासून रक्षण करत असतानाच फोन केला. आपली समस्या सांगितली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आपल्या सोबतच्या अधिकाऱ्याला फोन देऊन माहिती घेण्यास सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्यानेही या शेतकऱ्यांस तुमच्या जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगतो. तुमचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना बोलतो, असे बोलून कारवाईचे आश्वासन दिले. सध्या या दोघांची ऑडियो क्लिप खूप व्हायरल होतेय. एका उद्धवचं मुख्यमंत्रीपद गेले असताना दुसऱ्या उद्धवचा फोन घेऊन शेतकऱ्याचे काळजी घेणारे मुख्यमंत्री शिंदे ठरलेय.