बीड : परतीच्या पावसामुळे (rain) जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. पीक विम्यासाठी शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी (Farmers) पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवल्याची घटना समोर आली आहे. पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी अतुल सावे यांना आपली व्याथा सांगितली. अतुल सावे यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यानंतर अतुल सावे हे आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. शेतात पाणी साचले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे. मात्र अशी परिस्थिती असतान देखील अद्यापही पिक विमा न मिळाल्यानं शेतकरी निराश झाले आहेत.
दरम्यान यापूर्वी देखील खरीप हंगामात काही भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने पिक नष्ट झाले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. त्यातून सावरत असताना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात परतीचा पाऊस जोरदार झाल्यानं शेतात पाणी साचलं आहे. उभं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. सध्या शेतकरी हे पीकविम्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र अद्याही पीक विमा न मिळाल्यानं आक्रमक होत शेतकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या वाहनांचा ताफा अडवला, व त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली.