देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू सरदार सोडणार साथ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार

| Updated on: Apr 23, 2024 | 9:32 AM

devendra fadnavis sharad pawar: संजय क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले. परंतु मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. भाजपाकडून मला आजपर्यंत जनतेसाठी कुठलाच निधी मिळाला नाही.

देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू सरदार सोडणार साथ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार
devendra fadnavis sharad pawar
Follow us on

लोकसभा निवडणुकीत आयाराम गयाराम सुरु आहे. नाराज व्यक्ती दुसऱ्या पक्षात जात आहेत. सर्वाधिक इनकमिंग भारतीय जनता पक्षात सुरु असल्याचा दावा केला जात आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू पक्षाला रामराम ठोकणार आहे. सोलापूरमधील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना धक्का

संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षातून ते बाहेर पडत असल्याने हा फडणवीस यांना धक्का आहे. आता संजय क्षीरसागर हे उद्या २४ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: संजय क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली.
संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

का सोडणार पक्ष

भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सोडण्यापूर्वी मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांना पक्षात आपणास कसा त्रास दिला गेला, त्याचे पुरावे दिले, असे संजय क्षीरसागर यांनी सांगितले. संजय क्षीरसागर लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्ष सोडत असल्याने भाजपाची अडचण निर्माण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून संधी नाहीच…

संजय क्षीरसागर म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले. परंतु मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. भाजपाकडून मला आजपर्यंत जनतेसाठी कुठलाच निधी मिळाला नाही. यामुळे जनतेच्या उपकाराची उतराई कशी करणार? हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले. त्यांच्या भेटीसाठी मुंबईत तीन-तीन दिवस थांबावे लागले. जिल्ह्यातील राजकारणास कंटाळून क्षीरसागर पक्षातून बाहेर पडत आहेत.