कौमार्य चाचणीला विरोध केल्याने बहिष्कार, अंत्ययात्रेत कोणीही नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ठाणे : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या कुटुंबावर बहिष्काराच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मात्र कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही, त्याच्या अंत्ययात्रेवरही बहिष्कार घातल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथमधील विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला. विवेक तमायचीकर  यांच्या आजीचे काल रात्री दहा वाजता […]

कौमार्य चाचणीला विरोध केल्याने बहिष्कार, अंत्ययात्रेत कोणीही नाही!
Follow us on

ठाणे : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या कुटुंबावर बहिष्काराच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मात्र कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही, त्याच्या अंत्ययात्रेवरही बहिष्कार घातल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथमधील विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला.

विवेक तमायचीकर  यांच्या आजीचे काल रात्री दहा वाजता निधन झालं. या दुःखाच्या कार्यक्रमात कंजारभाट समाजातील लोकांनी सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र  तमायचीकर यांच्या आजीच्या अंतयात्रेत कंजारभाट समाजातील एकही माणूस सहभागी झाला नाही. यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता, म्हणून  कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षापासून त्यांना बहिष्कृत केले आहे.

त्यामुळेच जात पंचायतीने  तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला. तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्याचवेळी याच समाजातील एक लग्नाचा हळदी समारंभ सुरु होता. लग्न-हळद हे पूर्वनियोजित असतात हे मान्य आहे, पण या हळदी समारंभात डीजे लावून जल्लोष सुरु होता. एखाद्या माणसाचं निधन झाल्यानंतर परिसरात दुखवटा पाळला जातो. मात्र तमायचीकर यांच्या आजीचं निधन झालं असूनही डीजेचा दणदणाट सुरुच होता, शिवाय त्यांच्या अंत्ययात्रेतही कोणी आलं नाही. गावातील पुढाऱ्याने या अंत्ययात्रेस जाण्यास नागरिकांना मज्जाव केला.

“आपण समाजाच्या अनिष्ट परंपरेला विरोध करत आहोत म्हणून समाजाने माझ्यावर हा बहिष्कार टाकला आहे. याविरोधात पोलिसात तक्रार करणार आहे”, असं विवेक तमायचीकर यांनी सांगितले. तसेच शासनाने याची गंभीर घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने जात पंचायत निर्मूलन कायदा संमत केला आहे. एखाद्या कुटुंबाला जर बहिष्कृत केलं, तर संबंधित कुटुंबाने तक्रार करावी, आम्ही निश्चित कारवाई करु, असं पोलिसांनी सांगितलं.

एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना, अशा घटनांमुळे महाराष्ट्राची मान खाली जाण्याशिवाय राहणार नाही.