मोठी बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 ठिकाणी थेट…महापालिका निवडणुकीत काय होणार?
राज्यात एकूण 14 ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी युती तुटलेली आहे तिथे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BJP Shiv Sena Alliance : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेकांना तिकीट मिळाले तर काही पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आले. तर काही ठिकाणी आयारामांना आयारामांना तिकीट दिल्याने मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपामध्ये युती झाली आहे. तर काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, राज्यात एकूण 14 ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटली आहे. त्यामुळे या सर्व 14 महानगरपालिकांत नेमकं काय काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं कुठे-कुठे युती तुटली?
महायुतीमध्ये जागावाटपावून चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. काही ठिकाणी भाजपाने कमी जागा मिळतायत म्हणून ताणून धरले. तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युती करण्यास नकार दिला. त्याचाच परिणाम म्हणून एकूण 14 ठिकाणी शिंदे आणि भाजपामधील महायुती तुटली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती नसेल. या सर्वच ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.
16 जानेवारी रोजी निकाल
वरील 14 महापालिकांमध्ये महायुती तुटली असली तरी मुंबई, ठाणे यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांत मात्र शिंदे गट आणि भाजपा यांच्यात युती होत आहे. या ठिकाणी अजित पवार यांना मात्र त्यांनी दूर ठेवले आहे. दरम्यान, राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी निकाल लागेल. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड या महापालिका भाजपा, शिंदे गट, ठाकरे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी युती तुटलेली असताना नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
