Rane vs Shivsena: ‘सुपारी’वरुन राणे आणि शिवसेनेत जुंपली.. कुणी कुणाला संपवायच्या ‘सुपाऱ्या’ घेतल्या दोघेही करणार भांडाफोड

| Updated on: Jul 23, 2022 | 6:22 PM

आदित्य ठाकरे सध्या राज्याचा दौरा करुन उद्धव ठाकरेंची प्रतिमा कशी चांगली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र प्रत्यक्षात ते कसे कपटी आहेत, हे पुराव्यानिशी दाखवू असे आव्हानच नितेश राणेंनी शिवसेनेला दिले आहे. यावर शिवसेनेतूनही त्यांना जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कुणी केल्या, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, असे प्रत्युत्तर सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना दिले आहे.

Rane vs Shivsena: सुपारीवरुन राणे आणि शिवसेनेत जुंपली.. कुणी कुणाला संपवायच्या सुपाऱ्या घेतल्या दोघेही करणार भांडाफोड
राणे विरुद्ध शिवसेना
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे (Narayan Rane)यांना संपवण्याची सुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केला आहे. याबाबत आधी त्यांनी ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना समोर येऊन ही माहिती दिली. आदित्य ठाकरे सध्या राज्याचा दौरा करुन उद्धव ठाकरेंची प्रतिमा कशी चांगली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र प्रत्यक्षात ते कसे कपटी आहेत, हे पुराव्यानिशी दाखवू असे आव्हानच नितेश राणेंनी शिवसेनेला दिले आहे. यावर शिवसेनेतूनही त्यांना जोरदार उत्तर देण्यात आलं आहे. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कुणी केल्या, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, असे प्रत्युत्तर सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना दिले आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असताना चर्चेत येण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी असे ट्विट केले असल्याचा आरोपही नाईक यांनी केला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचे नाव आहे, याची आठवणही वैभव नाईक यांनी या निमित्ताने करुन दिली आहे.

सुपारीबाजांचं लवकरच वस्त्रहरण करणार- नितेश राणे

एकनाथ शिंदे यांची झेड प्लस सुरक्षा वर्षा बंगल्यावरुन नाकारण्यात आली होती, त्या घटनेनंतर राणे कुटुंबीयाला आधीच्या प्रसंगाची आठवण आली. सध्या आदित्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत आहेत, त्यात उद्धव ठाकरेंची प्रतिमा कशी सोज्वळ, चांगली, कुटुंबप्रमुख आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याच पक्षप्रमुखांकडून राणेंना संपवण्यासाठी असंख्य वेळा सुपारी देण्याचे काम झाले आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ही माहिती आणि पुरावे आहेत, योग्य वेळ आल्यानंतर ते पक्षप्रमुख किती कपटी आहेत, याचे पुरावे राज्यासमोर देईन असे नितेश राणे म्हणाले आहेत. संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सध्या म्याव म्यावचे आवाज येत आहेत. ते संपल्यानंतर वस्त्रहरण कसे असेल हे आम्ही दाखवू असे राणे म्हणाले आहेत. अशा प्रकारचे ट्विट जाणीवपूर्वक केले असल्याचे नितेश राणे म्हणाले. कोरोना काळात पक्षप्रमुख आजारी होते, त्या काळी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे संध्याकाळी सात वाजता दिनू मोर्याच्या घरी काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुपाऱ्या घेऊन हत्या कुणी केल्या हे महाराष्ट्राला माहीत- वैभव नाईक

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणेंसह नारायण राणेंवर वैभव नाईक यांनी निशाणा साधा आहे. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. असे वैभव नाीक म्हणाले. श्रीधर नाईक,विजय भिसे, अंकुश राणे, गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. असे सांगत त्यांनी राणेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंचेही शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आहे. याची आठवण त्यांनी करुन दिली. शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत. असेही नाईक म्हणालेत. सुपारीबाज कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू. असे प्रतिआव्हानच नाईक यांनी दिले आहे.