सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला पोलिसांनी अटक केली. सोमवारी 18 मार्चला साकिनाका परिसरातून नीरज देसाईला अटक करण्यात आली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला […]

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला पोलिसांनी अटक केली. सोमवारी 18 मार्चला साकिनाका परिसरातून नीरज देसाईला अटक करण्यात आली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे

सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 31 जण जखमी झाले होते. गेल्या 14 मार्चला सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास ऐन गर्दीच्यावेळी या पुलाचे स्लॅब कोसळले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका दोघांनीही या पुलाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली. त्यानंतर हा पूल महापालिकेचा असल्याचं समोर आलं.

या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचं कंत्राट आरपीएस कंपनीकडे होतं. या कंपनीला शनिवारी 16 मार्चला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला 15 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. आरपीएस कंत्राटदाराने हिमालय पुलाची दुरूस्ती 2013 मध्ये केली होती. मग 2017-18 दरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. हे स्ट्रक्चरल ऑडिट देसाई कन्सल्टन्स या कंपनीने केले होते. या ऑडिटमध्ये पूल धोकादायक नसल्याचं म्हटलं होतं. केवळ किरकोळ डागडुजी सुचवली होती.

ऑडिट करताना निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप नीरज देसाईवर आहे. याप्रकरणी त्याच्यावर कलम 304/2 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितलं. नीरज देसाई सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेनेही दोषींवर कारवाई केली होती. पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता  ए. आर. पाटील आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत कलम 304 ए अंतर्गत रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याचिकेवर 22 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

कसाब पूल

मुंबईवर 2008 मध्ये 26/11 रोजी जो हल्ला झाला होता, तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो. दहशतवादी अजमल कसाब सीएसएमटी स्टेशनवर फायरिंग करुन याच ब्रिजवरुन चालत चालत पुढे कामा हॉस्पिटलकडे गेला होता. या ब्रिजवर असताना महाराष्ट्र टाईम्सच्या फोटोग्राफरने फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कसाबने त्यांच्या दिशेने फायरिंग केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर कसाब पुढे छोट्याशा गल्लीतून कामा हॉस्पिटलकडे गेला. तेव्हापासून हा ब्रिज कसाब पूल म्हणून ओळखला जातो.

संबंधित बातम्या :

पूल दुर्घटना: 42 तासांनी आयुक्तांची मुंबईकरांसाठी केवळ 9 सेकंदाची प्रतिक्रिया

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

पूल दुर्घटनेचा उद्धव ठाकरेंच्या भाषणात साधा उल्लेखही नाही!

…मग कोसळलेला पूल कुणाचा? जबाबदारी कुणाची?