National Leprosy Prevention Day | आनंदवन बनले साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर; बाबा आमटेंनी नेमकं काय केलं?

कुष्ठरोग्यांकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण अतिशय वाईट होता. अशा कालावधीत समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केले. या आनंदवनात त्यांनी हजारो कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवले. त्यांना आत्मनिर्भर केले. 

National Leprosy Prevention Day | आनंदवन बनले साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर; बाबा आमटेंनी नेमकं काय केलं?
समाजसेवक बाबा आमटे
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 7:00 AM

गोविंद हटवार

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची गोष्ट. समाजात कुष्ठरोगाला मागील जन्माचे पाप म्हणून पाहिले जात होते. कुष्ठरोग्यास वाडीत टाकले जात असे. बाबा आमटे (Baba Amte) रस्त्यानं जात होते. बाबांनी पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी बघीतला. तुळशीराम त्याचं नाव. बाबांचं मन हेलावलं. ते त्याला घरी घेऊन गेले. वकिलीचे शिक्षण झालेल्या बाबांनी कुष्ठरोगाचा अभ्यास सुरू केला. 1949-50 मध्ये बाबांनी कुष्ठरोग निदान आणि चिकित्सेवरील (Diagnosis and treatment of leprosy) अभ्यासक्रम पूर्ण केला. कुष्ठरोग्यांकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी त्यांनी 1952 साली वरोऱ्याजवळ आनंदवनाची (Anandvan) स्थापना केली. 2008 पर्यंत हे आनंदवन 176 हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारले. साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले. त्यांचा हा वारस त्यांचे कुटुंबीय चालवत आहेत. कुष्ठरोग्यांकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण अतिशय वाईट होता. अशा कालावधीत समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केले. या आनंदवनात त्यांनी हजारो कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवले.

कुष्ठरोग्यांना कसे केले आत्मनिर्भर

कुष्ठरोग हा महाभंयकर रोग मानला जात होता. अशावेळी बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांची सेवा करण्याचे व्रत स्वीकारले. कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्याचा चंग त्यांनी बांधला. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन यासाठी त्यांनी रुग्णालयाची स्थापना केली. त्यांच्या शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केले. हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसायिक प्रशिक्षण दिले. कुष्ठरोग्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला. दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय कुष्ठरोग्यांसाठी सुरू करून दिले. यामुळं कुष्ठरोगी स्वावलंबी झाले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

नापीक जमिनीवर उभारले आनंदवन

आश्रमासाठी त्यांना सरकारकडून जमीन मिळाली. सुरुवातीला फक्त सहा कुष्ठरोगी होते. पैशाची चणचण होती सोबत १४ रुपये रोख होते. शिवाय एक आजारी गाय आश्रमात होती. नापीक असलेल्या जमिनीवर बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केला. या नापीक जमिनीला सुपीक केले. तिथं भाजीपाल्याची लागवड केली. वेगवेगळे कुटिर उद्योग सुरू करून कुष्ठरोग्यांना त्यांच्या पायावर उभे केले. त्यांच्या या कार्यात पत्नी साधना आमटे यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमात बाबा आमटे यांनी भेट दिली होती. या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी दीनदलितांची सेवा करण्याचे ठरविले. यातूनच कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू झाले. 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिन. या दिवशी कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. यानिमित्त बाबांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!