औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जळजळीत शब्दांत टीका केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे भाजपे शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा आहे, असे वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आता अर्जुन खोतकर यांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तर उस्मानाबाद येथे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस जोपर्यंत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये शिवसैनिक आक्रमक होताना दिसून आले. विशेषत: मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यात शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने करण्यात आली.
नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक आणि पुणे पोलिसांचे पथक रत्नागिरीत दाखल झाल्याचे समजते. मात्र, नारायण राणे यांना पोलिसांना अटक केली तरी भाजपची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांच्या अनुपस्थितीत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार या जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्त्व करतील आणि ती पूर्ण करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही भाजप नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण भाजप एक पक्ष म्हणून नारायण राणे यांच्या पाठिशी आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर
मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही
मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या