आमदार प्रशांत बंब यावेळी शिक्षकांवर नाही तर या लोकांवर भडकले

मला काय आमदारकी चाटायची नाही, मी फक्त पाटी लावण्यासाठी चार चार वेळा आमदार होणार नाही. मी जनतेच्या चांगल्यासाठी भूमिका घेतली आहे. सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी कधीही शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत असा आरोप प्रशांत बंब यांनी केला.

आमदार प्रशांत बंब यावेळी शिक्षकांवर नाही तर या लोकांवर भडकले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2022 | 7:31 PM

औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) आणि शिक्षकांमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला. औरंगाबादच्या हमखास मैदानावरती शिक्षकांचा हा मोर्चा निघाला. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले. काही शिक्षक आमदारांनी शिक्षकांच्या या आंदोलनाला सपोर्ट केला आहे. या आंदोलनानंतर प्रशांत बंब यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. मला काय आमदारकी चाटायची नाही असं म्हणत प्रशांत बंब यांनी शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या शिक्षक आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

शिक्षकांचा मोर्चा हा बेकायदेशीर होता. त्यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे. शिक्षक आणि पदवीधर आमदार हे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहेत. हे आमदार शिक्षकांच्या जीवावर निवडून येण्यासाठी खोटं बोलत असल्याचा आरोप देखील बंब यांनी केला.

शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार या जागा आता रद्द केल्या पाहिजेत. मी शिक्षणाचे खाजगीकरण करत नाही माझी एकही शाळा नाही. उलट याच शिक्षक आमदारांनी स्वतः शाळा उघडल्या आहेत. यांनीच संस्था काढल्या आहेत, राजकारणी लोक आमदार असून संस्था शाळा कशा काय उघडू शकतात, याच लोकांनी शिक्षणाचे खाजगीकरण केलं आहे. संस्थांच्या नावावर सरकारी तिजोरीतील पैशांवर डल्ला मारला आहे.

मला काय आमदारकी चाटायची नाही, मी फक्त पाटी लावण्यासाठी चार चार वेळा आमदार होणार नाही. मी जनतेच्या चांगल्यासाठी भूमिका घेतली आहे. सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी कधीही शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत असा आरोप प्रशांत बंब यांनी केला. तिजोरीतील सगळे पैसे शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात, त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा पडत आहे.

जिल्हा परिषद शिक्षणाची वाताहत झाली आहे. येथील शिक्षक मुलांना उत्तम दर्जाचे शिक्ष दिले जात नाही. यामुळेच आमदार आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवत नाहीत.

कोणत्याही 20 शाळा निवडाव्या आणि येथील शिक्षणाचा दर्जा तपासावा. यांनतर जे सत्य समोर येईल त्यांनंतर शिक्षकांना मुख्यालयी राहवे ही मागणी मी मागे घेऊन असे आव्हान बंब यांनी दिले. मुलांच्या पिड्या बरबाद होऊ देणार नाही, मला त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल असं म्हणत शिक्षकांच्या बाबतीत माघार घेणार नसल्याचा स्पष्ट इशाराच बंब यांनी दिला आहे.