देशात लोकसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांचा जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. हिंगोली आणि नांदेडच्या जागेवर महायुतीत तिढा असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावर शिवसेना शिंदेगटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोलीची जागा शिवसेनेची आहे. ती आम्हीच लढवणार आहोत. नांदेडची जागा भाजपची आहे. ती त्यांना दिली आहे. उमेदवार बदल्याचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. पक्षाचा मुख्यनेता जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं संजय शिरसाट म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपावर त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी काही टप्प्याचे काही दिवस बाकी आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची गर्दी धावपळ संपेल. महायुतीत सर्व जागांवर बोलणी झाली आहे. एक दोन जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर निर्णय होईल. सर्व उमेदवार एक दोन दिवसात घोषित होतील, असं शिरसाट म्हणाले.
नाशिकचे शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. काहीवेळा आधी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. गोडसे ठाकरे गटात येणार असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. गोडसे यांनी ती जागा दोन वेळेस जिंकली आहे. त्या जागेसाठी आम्ही आजही आग्रही आहोत आणि उद्याही आग्रही असणार आहोत. लवकरच याबाबत निर्णय होईल. कोल्हापूर उमेदवार बदलणार नाही, असं चित्र आहे. इतर पक्षाला जाणार नाही हे स्पष्ट आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
भाजपने शिवसेनेला मराठवाडा अडचणी आणलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व नेत्यांनी ठरवून परभणीची जागा महादेव जानकर यांना जागा दिली आहे. इतर जागांची बोलणी झाली नाही. हिंगोली आमची आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा ही आधीपासून आमच्याकडे असल्याने ती आम्ही लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रश्न नाही, असं शिरसाट म्हणाले.