दोघात तिसरा, सुखी संसार विसरा, मोबाईलमुळे 30 टक्के कुटुंबात कलह
दोघात तिसरा आणि सुखी संसार विसरा असं सध्या चित्र घरोघरी दिसत आहे. संसारात विष कालवणारा हा दुसरा-तिसरा कुणी नसून, तुमच्या हातात असलेला मोबाईल आहे.
नागपूर : दोघात तिसरा आणि सुखी संसार विसरा असं सध्या चित्र घरोघरी दिसत आहे. संसारात विष कालवणारा हा दुसरा-तिसरा कुणी नसून, तुमच्या हातात असलेला मोबाईल आहे. घरी पती-पत्नी एक दुसऱ्यांना कमी आणि मोबाईलवर, सोशल मीडियाला जास्त वेळ देत असल्याचं दिसून आलं आहे. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीनुसार 30 टक्के संसारात मोबाईल-सोशल मीडिया विष कालवत आहेत.
घरात पती-पत्नीचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मोबाईल-सोशल मीडिया सुखी संसारात विष कालवत आहेत. 30 टक्के घरगुती भांडणं मोबाईल-सोशल मीडियामुळे होत असल्याचं वास्तव, नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने समोर आणलं आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराने घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे.
सुखी संसारात व्हिलन ठरलेल्या सोशल मीडियाचं हे वास्तव. नागपूरसारख्या मोठ्या शहरात बरेच पती-पत्नी नोकरी करतात. सायंकाळी घरी आल्यानंतर एक-दुसऱ्यांना देण्याचा वेळ, बरेच पती-पत्नी मोबाईलवर फेसबूक, व्हॉटसअपला जास्त देतात. यातूनच घरगुती वादाची ठिणगी पेटली जाते. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दरवर्षी सव्वादोन हजाराच्या आसपास घरुगुती भांडणाचे खटले येतात. त्यापैकी 30 टक्के कुटुंबाच्या सुखी संसारात मोबाईल आणि सोशल मीडियाच विलन असल्याचं दिसून येत असल्याची माहिती, भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभदा संख्ये यांनी दिली.
नागपूर पोलीसांनी घरगुती वाद सोडवण्यासाठी भरोसा सेलची सुरुवात केली आहे. या भरोसा सेलमध्ये वर्षाला अनेक तक्रारी येत आहेत.
भरोसा सेलकडे येणारी घरगुती भांडणं वर्ष खटले
2017 2303 कुटुंबात वाद
2018 2814 कुटुंबात वाद
मे 2019 पर्यंत 1000 पेक्षा जास्त कुटुंबात वाद
यापैकी 30 टक्के कुटुंबात मोबाईल आणि सोशल मीडिया विष कालवत असल्याचं वास्तव आहे. सोशल मीडिया दुधारी शस्र आहे, त्याचा सकारात्मक कामांसाठीही वापर होतो, तर अतिवापर कौटुंबीक सख्य बिघडवते, असं सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे सांगतात. हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नपुंसकता, अशी कारणं यापूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात दिली जायची. पण आता हायटेक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापरही घटस्फोटाचं कारण ठरतंय.
नविन टेक्नॉलॉजी, नव नवे मोबाईल, कॉम्प्युटर-लॅपटॉप आपल्या विकासासाठी आहेत. सोशल मीडियाही आपल्याला जगाशी कनेक्ट ठेवतो. पण या नादात आपले हक्काचे घरचे लोक मात्र दूर जातात. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी, कारण जिथे अति होतं तिथे माती होते, हेच घरगुती वादाच्या अनेक केसेसमध्ये दिसून आलं आहे.