दुष्काळाची दाहकता, कोरडीठाक गोदावरी, भग्न मंदिरं !
नाशिक : ज्या ठिकाणी गोदावरी नदी चंद्राकार प्रवाह धारण करते, ते ठिकाण म्हणजे निफाड तालुक्यातील चांदोरी. चंद्रावती या विशेषणाचा अपभ्रंश होऊन चांदोरी हे ग्रामवाचक नाव तयार झाले. ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या या चांदोरी गावाच्या दक्षिणेला वाहणारी गोदावरी नदी यंदा कोरडीठाक पडली. त्यामुळे अनेक पुरातन मंदिरे उघडी पडली आहेत. ही मंदिरे पाहून आपण 7 व्या […]
नाशिक : ज्या ठिकाणी गोदावरी नदी चंद्राकार प्रवाह धारण करते, ते ठिकाण म्हणजे निफाड तालुक्यातील चांदोरी. चंद्रावती या विशेषणाचा अपभ्रंश होऊन चांदोरी हे ग्रामवाचक नाव तयार झाले. ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या या चांदोरी गावाच्या दक्षिणेला वाहणारी गोदावरी नदी यंदा कोरडीठाक पडली. त्यामुळे अनेक पुरातन मंदिरे उघडी पडली आहेत. ही मंदिरे पाहून आपण 7 व्या 8 व्या शतकात आहोत की काय? असा प्रश्न पडावा, इतके अप्रतिम शैलीची ही मंदिरे आपल्या नजरेत भरतात.
1908 मध्ये ब्रिटिशांनी नांदुर्मध्यमेश्वर धरण बांधले आणि गोदावरीचा प्रवाह बदलून गावाच्या कडेला असलेली ही मंदिरे पाण्याखाली आली. तेव्हापासून दुष्काळाचे काही अपवाद वगळता ही मंदिरे सातत्त्याने पाण्याखालीच असल्याने, ती सहसा कोणाला पाहायला मिळत नाहीत. यंदा मात्र गोदामाई पूर्ण आटल्याने ही मंदिरे दृष्टिक्षेपात आली आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीही ही मंदिरे उघडी पडली. 111 वर्षांतील ही पाचवी घटना असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
पुरातत्व खात्याकडे फारशी नोंद नसल्याने या मंदिराचा कार्यकाल अचूक सांगता येत नाही. काहींच्या मते ही मंदिरे शिवकालीन, तर काहींच्या मते यादवकालीन असावी असा अंदाज आहे. मात्र नदीपात्रात जसजसे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो तसतशी मंदिरांच्या शिल्पशैलीत बदल होतो. शिवाय ती मंदिरं अधिक विकसित झालेली दिसते, ही मंदिरे हेमाडपंती शैलीची आहेत.
नदीपात्रात प्रवेश केला की लहान मोठे शिवलिंग, नदीत पाण्याचा थेंबही नसताना कठोकाठ भरलेले तळे, स्वातंत्रपूर्व काळात बांधलेली पक्की विहीर, अशी पुरातत्व वारसा सांगणारी एक संस्कृतीच या नदीच्या पात्रात दडलेली पाहायला मिळते. या पात्रात 10 मंदिरे आहेत, शंकराची पिंड आणि मंदिरांची एक भलीमोठी रांगच पाहायला मिळते. त्याबरोबरच उजव्या सोंडीचा गणपती, जिवंत समाधी,देवडी,शेषनारायण,आकर्षक घाट,शनीमूर्ती अशी विविध रुपे पाहायला मिळतात.
सायखेडा आणि चांदोरीला जोडणाऱ्या पुलाजावळून कोरड्या नदीपात्रात प्रवेश केल्यावर प्रथमच नजरेत भरते ते शिंदयाचे शिवमंदिर. यालाच पाध्धे मंदिर असेही म्हणतात. काळ्या पाषाणाचे अतिशय कोरीव नक्षीकाम पाहून मन प्रसन्न होतं.
इथे एक अख्यायिका आहे. वरुणाने शाप दिल्याने पायाला भेग पडली. त्यामुळे सूर्याच्या सांगण्यावरुन इंद्राने इथे तप केल्याने तो शापमुक्त झाला, अशी आख्यायिका लोक सांगतात. पण मूर्तीची पद्धत, आयुधे हे पाहिल्यावर ही मूर्ती विष्णूची आहे हेच जाणवते. मूर्तीपुढे शिवलिंग आहे, त्यामुळे इंद्रेश्वरही म्हणत असावे अशीच मूर्ती कुशावरतावरही असल्याचे अभ्यासक सांगतात.
नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरुन पाहिले तर इंद्रेश्वर मंदिराच्या पाठीमागे दोन भव्य दिव्य घाट बांधलेले आहेत. इतक्या वर्षात अनेकदा पूर आले, सतत पाण्याखाली असूनही या घाटांची काहीही झीज झालेली नाही याचं खूप आश्चर्य वाटते.