Shirdi : साईबाबांना हार-फुले अन् प्रसाद वाढवला जाणार की नाही..! गृहमंत्री अमित शाह यांनीही घेतली शिर्डीतील आंदोलनाची दखल

मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मतभेद असल्याने हार-फुले आणि प्रसादाचा मुद्दा चिघळला आहे. स्थानिकचे शेतकरी, फुल विक्रेत्ये आणि व्यापारी यांनी तर आंदोलनही केले होते. फुल विक्रीवरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे याला नव्याने परवानगी देण्याची मागणी आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्यासाठी आता महसूल मंत्री विखे-पाटील यांनी एक समितीची स्थापना केली आहे.

Shirdi : साईबाबांना हार-फुले अन् प्रसाद वाढवला जाणार की नाही..! गृहमंत्री अमित शाह यांनीही घेतली शिर्डीतील आंदोलनाची दखल
Image Credit source: tv9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 27, 2022 | 4:25 PM

शिर्डी :  (Corona) कोरोना काळापासून येथील (Sai Temple) साईमंदिरात हार-फुले आणि प्रसाद वाढवण्यास बंदी घातली होती. ती अद्यापही कायम आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून याला पुन्हा नव्याने परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतकरी आणि फुल विक्रेत्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे मंदिर समितीकडून याला विरोध होतोय. हे प्रकरण एवढे वाढले आहे की, याबाबत (Radhakrishna Vikhe-Patil) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना केंद्रीय स्थरावरुन सूचना देखील आल्या आहेत. मंदिर समिती आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यामध्ये बैठक सुरु असतनाच महसूल मंत्री विखे-पाटलांना थेट गृहमंत्री अमित शाह यांचाच फोन आला होता. त्यामुळे हार-फुलांना आणि प्रसादाला मान्यता मिळणार की प्रशासनाचा निर्णय कायम राहणार हे पहावे लागणार आहे.

महिन्याभरात होणार निर्णय, समितीची स्थापना

मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मतभेद असल्याने हार-फुले आणि प्रसादाचा मुद्दा चिघळला आहे. स्थानिकचे शेतकरी, फुल विक्रेत्ये आणि व्यापारी यांनी तर आंदोलनही केले होते. फुल विक्रीवरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे याला नव्याने परवानगी देण्याची मागणी आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्यासाठी आता महसूल मंत्री विखे-पाटील यांनी एक समितीची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधिकारी यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या समितीच्या निष्कर्षानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री अन् केंद्रीय गृह मंत्र्यांनीही घेतली दखल

साईबाबा मंदिर परिसरात फुल आणि हार विक्रीला परवानगी नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी, फुल विक्रेत्ये यांचे आंदोलन सुरु होते. मात्र, हा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही चर्चा झाल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. तर ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या बैठकी दरम्यानच विखे-पाटलांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय़ होईल. यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या काय आहेत सूचना?

शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी केवळ राज्यातूनच नाहीतर देशभरातून भक्तांची गर्दी असते. ह्या मुद्द्यामुळे शिर्डीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पण याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनीही दखल घेतली असून नेमकी येथील स्थिती काय याचा आढावा घेतला. शिवाय दोन्ही मुद्दे घेऊन मधला मार्ग काढावा अशा सूचना शाह यांनी दिल्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात हा प्रश्न निकाली निघले अशी अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us