Agneepath Scheme : अग्निपथ योजनेवरुन आक्रोश कायम! आजही ट्रेन पेटवली, एसी कोचमध्ये आग लावून संताप व्यक्त

| Updated on: Jun 17, 2022 | 10:36 AM

Agneepath Scheme News : अग्निपथ योजने चार वर्षांच्या सेवेचा कालावधी देण्यात आला आहे. यावर तरुणांनी नाराजी व्यक्त केलीय

Agneepath Scheme : अग्निपथ योजनेवरुन आक्रोश कायम! आजही ट्रेन पेटवली, एसी कोचमध्ये आग लावून संताप व्यक्त
आगडोंब सुरुच...
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : अग्निपथ (Agneepath Scheme) योजनेवरुन सुरु असलेला तरुणांचा आक्रोश कायम आहे. आज सकाळीही निदर्शनं (Protest) करण्यात आली. यावेळी पुन्हा एका ट्रेनला निशाणा बनवण्यात आलं. काही तरुणांनी बिहारमध्ये (Bihar) एका ट्रेनला आग लावली. तरुणांनी गुरुवारीही अनेक एसी कोच पेटवून दिले होते आणि अग्निपथ योजनेतील खटकलेल्या बाबींवर सरकारचं लक्ष वेधलं होतं. आज सकाळी उत्तर प्रदेशच्या बलिया रेल्वे स्थानकात तोडफोड केली. तर इकडे बिहारच्या समस्तीपूर आणि लखीसराय ट्रेनला आग लावण्यात आली. गुरुवारी देखील देशभरात वेगवेगळ्या राज्यात आंदोलन पाहायला मिळालं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालंय. अनेक ठिकाणी आगडोंब तर काही ठिकाणी रेल्वेरोको करण्यात आला. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात तरुण आपला संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

लखीसरायमध्ये तणाव…

लखीसरायमध्ये ट्रेन पेटवून दिल्यानंतर प्रवाशांचीही घबराट उडाली होती. यानंतर प्रवाशांनी सुदैवानं वेळीच डब्यातून बाहेर येत प्रसंगावधान राखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. एकूण चार ते पाच रेल्वे डब्बे आगीत जळून खाक झालेत.

अग्निपथवरुन अग्नितांडव! 9 मोठ्या घटना..

  • बिहारच्या समस्तीपूर आणि लखीसराय ट्रेनला आग
  • आज उत्तर प्रदेशच्या बालियामध्ये निदर्शनं
  • गुरुवारी बिहारमध्ये तीन ट्रेन जाळल्या
  • कैमूक भाबुओ रोडवर इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागवली
  • आरा स्टेशनवर दगडफेक
  • सुविधा एक्स्प्रेसच्या एसी बोगीच्या काचा फोडल््या
  • बक्सरमध्ये डुमराव रेल्वे स्टेशनला आग लावली
  • बिहारच्या जहानाबादमध्ये टायर जाळून रेल्वे रोको
  • हरियाणातली पलवमध्ये अग्निपथ विरोधात प्रचंड रोष, शेकडो तरुणांची रस्त्यावर उतरून निदर्शनं

जे बिहारमध्ये तेच यूपीतही

बिहार सोबत यूपीच्या बालियामध्येही ट्रेन पेटवून देण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेत. या वाढत्या घटनांमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रेल्वे प्रवासी कमालीचे धास्तावलेत.

वयात वाढ…

दरम्यान, विद्यार्थ्यांना तीव्र रोषानंतर केंद्र सरकारनं अल्पसा दिलासा दिला आहे. यंदा अग्निपथ योजने भरती होण्यासाठी दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. 21 वर्ष वयोमर्यादेवरुन दोन वर्षांची वाढ करत आता 23 वय वर्षांपर्यंतच्या तरुणांना या योजनेचा लाभ घेऊ येऊ शकेल. मात्र हा निर्णय फक्त या वर्षासाठीच घेतला गेला आहे. त्यानंतर पुन्हा वयोमर्यादा 21 वयवर्ष असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या काय मागण्या?

अग्निपथ योजने चार वर्षांच्या सेवेचा कालावधी देण्यात आला आहे. यावर तरुणांनी नाराजी व्यक्त केलीय. खासदार आणि आमदारांचा कालावधी पाच वर्ष असताना या योजनेत फक्त चार वर्षांचीच मर्यादा का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत देशसेवा करणाऱ्या अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन नसणार आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या योजनेअंतर्गत सेवा बजावणाऱ्यांना पेन्शनही मिळायला हवी, अशी मागणी जोर धरतेय.

अग्निपथ योजना नेमकी काय आहे?

राजनाथ सिंह यांनी बुधवारी दुपारी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. यावेळी तीनही सैन्यदलाचे प्रमुख हजर होते. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य दलात तरुणांना देशसेवेची संधी देण्यात येईल, असं त्यांनी म्हटलंय. या योजनेअंतर्गत असलेलाय सेवेचा कालावधी चार वर्षांचा असेल. ही भरती मेरिट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर होईल. तर या योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्यांना अग्निवीर म्हणून संबोधलं जाईल. चार वर्षांच्या काळात अग्निवीरांना 30 ते 40 हजार एवढे वेतन दिलं जाणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत 17 ते 21 वयोगटातील 45 हजारांपेक्षा अधिक तरुणांची सैन्यात भरती केली जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता या वर्योमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता 17 ते 23 वयोगटातील तरुणांना या वर्षी अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत भरती करुन घेतलं जाणार आहे.