Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी; शाही स्नान रद्द

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी आयोजित करण्यात आलेलं शाही स्नान रद्द झालं आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी; शाही स्नान रद्द
| Updated on: Jan 29, 2025 | 8:42 AM

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे.  प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आहे. तात्काळ मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.

 

नेमकं काय झालं ?

महाकुंभात मौनी अमावस्येला अमृत स्नानापूर्वी चेंगराचेंगरी झाली. मात्र, जखमी आणि मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. आज महाकुंभमध्ये मौनी अमावस्येचे अमृत स्नान आहे. त्यानिमित्नाने कोट्यावधी भाविक संगमावर स्नानासाठी आले होते, मात्र त्यामुळे प्रचंड गर्दी झाली. मध्यरात्री 1 च्या सुमारास तेथे मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले , त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार 50 हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना आखाड्यांचे अमृत स्नान सध्या तरी थांबवण्यात यावे असे आवाहन केले आहे.

मौनी अमावस्येला अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्वाचा विधी आहे. आज येथे सुमारे 10 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. यंदा 144 वर्षांनंतर ‘त्रिवेणी योग’ नावाचा दुर्मिळ योग होत असून, या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे.

 

1 हजाराहून अधिक वैद्यकीय कर्मचारी तैनात

मौनी अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने येथे 1 हजाराहून अधिक वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. एका निवेदनानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आधुनिक वैद्यकीय सुविधा मेळ्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध करून दिले. महाकुंभनगर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 300 तज्ज्ञ डॉक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते तयार असतात, अशी माहितीही समोर आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us