Arvind Sawant : शिवसेनेतलं “महाभारत” वाढलं, अरविंद सावंत म्हणतात कौरवांपुढे पांडवांचा विजय झाला, सत्याला वेळ…
आता अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही शिंदे गटाला इशारा देणं सुरूच ठेवलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाभारताचा दाखला देत शिंदे गटाबाबत सूचक विधान केला आहे.
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आणि शिवसेनेमध्ये जे महाभारत सुरू झालं आहे ते संपायचं नाव घेत नाहीये. कारण एकीकडून शिंदे गटाकडून (Eknath Shinde) तोफा डागल्या जात आहेत, तर दुसरीकडून ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) टीकेचे बाण सोडले जात आहेत. हे गद्दारच होते, यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, त्यामुळेच यांनी बंड केलं. अशी घनाघाती टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून होतेय, तर तुम्ही एवढे लोक का सोडून जात आहेत, त्याचा विचार करायला हवा, असा पलटवार शिंदे गटाकडून केला जातोय. त्यातच आता अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही शिंदे गटाला इशारा देणं सुरूच ठेवलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाभारताचा दाखला देत शिंदे गटाबाबत सूचक विधान केला आहे.
विजय हा पांडवाचाच झाला, शिंदेंना इशारा
अरविंद सावंत हे सध्या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीतून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, ती शिवसेना आता हलली आहे. शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो आणि पुढेही कायम राहणार असे स्पष्ट वक्तव्यं अरविंद सावंत यांनी केलं आहे. तसेच देशात सगळीकडे खोटारडेपणा चालला आहे. त्यामुळे मंथनाची गरज आहे, सत्य कधी हरत नाही, सत्याला परीक्षा मात्र द्यावी लागते. रामायण महाभारतात ही परीक्षा द्यावी लागली. पण कौरवांपुढे विजय हा पांडवांचाच झाला. हा इतिहास आहे, असा थेट इशारा सावंत यांनी शिंदे यांना दिला आहे.
आम्ही फक्त बोलत नाही, करून दाखवतो
तसेच काश्मीरमध्ये हिंदूंना जेव्हा पळवून लावलं जात होतं. तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहिली. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीशी उभा राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात कश्मीरी पंडितांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी आरक्षण लागू करण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही फक्त बोलत नाही आम्ही करून दाखवतो म्हणत त्यांनी भाजपच्या 15 लाख देण्याच्या वक्तव्याचा ही समाचार घेतला आहे. तसेच अरविंद सावंत यांनी आज दिल्ली आणि छत्तीसगडमधील शिवसैनिकांच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत. हे शिवसैनिक जंतर-मंतरवर आंदोलन करत होते, त्यावेळी अरविंद सावंत यांनी हे वक्तव्य केलं आहे. या आंदोलनाला शिवसेना नेत्यांनी आज भेट दिली आहे. हे अधिवेशनही वादळी ठरताना दिसत आहे.