मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने पक्षातील पडझड रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे आता स्वत: सक्रिय झाले आहेत. ठाकरे यांनी आधी जिल्हा संपर्क प्रमुख, नंतर जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार आणि नगरसेवकांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आता शिवसेना (shivsena) भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. मात्र, एकीकडे आमदार फुटत असतानाच शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, अनंत गिते आणि रामदास कदम यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या तिघांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे की इतर काही कारणास्तव या नेत्यांनी बैठकीला दांडी मारली हे कळू शकले नाही. या तिन्ही नेत्यांनी त्याबाबतचा खुलासाही केला नाही. पण शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच या तिन्ही नेत्यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक आहे. रामदास कदम, अनंत गिते आणि रामदास कदम हे तीन नेते वगळता सर्व नेते बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत काही प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच अत्यंत धाडसी निर्णयही या बैठकीत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चार महत्त्वाचे ठराव करण्यात आलं आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणार असल्याचा पहिला ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मराठी अस्मितेशी कधीही प्रतारणा करण्यात येणार नाही असा दुसरा ठराव मांडण्यात आला. तोही मंजूर करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे, असा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला. सर्वांनी टाळ्या वाजवून हा ठराव मंजूर केला.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात येणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तसेच त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखपदीही ठेवणार की नाही हे सुद्धा अजून स्पष्ट झालं नाही.
दरम्यान, आजच्या बैठकीत होणारे सर्व ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना अजूनही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.