Dip Amavashya 2022: उद्या दीप अमावास्या, मुहूर्त, महत्त्व आणि कथा

योगायोगाने दीप अमावास्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

Dip Amavashya 2022: उद्या दीप अमावास्या, मुहूर्त, महत्त्व आणि कथा
दीप पूजन
Image Credit source: Social Media
Nitish Gadge | Updated on: Jul 27, 2022 | 3:20 PM

उद्या दीप अमावास्या आहे.  श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येते. चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या (Dip Amavasya) म्हणतात.  येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. योगायोगाने दीप अमावास्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. पंचांगानुसार, या वर्षी अमावस्या तिथी शनिवार, 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटापर्यंत राहील. तर गुरुपुष्यामृतयोग 28 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

दीप अमावास्येची कथा

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली.

नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली.

अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘ येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात  दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले.

मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घर धनधान्याने समृद्ध झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us