Banana Rate: सर्वकाही नियोजनाप्रमाणे, वातावरण निवळले, केळीची आवक सुधारली अन्…

थंडीत घट होऊन फेब्रुवारीमध्ये उन्हामध्ये वाढ होताच केळीच्या मागणीत वाढ होईल असाच अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो खरा होताना पाहवयास मिळत आहे. कारण ज्या खानदेशात केळीचे उत्पादन अधिकचे असते त्या भागात केळीचे दर कमाल 900 रुपये प्रति क्विंटलवर पोहचलेले आहेत.

Banana Rate: सर्वकाही नियोजनाप्रमाणे, वातावरण निवळले, केळीची आवक सुधारली अन्...
खानदेशात केळीचे अधिक उत्पादन घेतले जाते. केळी काढणी अवस्थेत आहे.
| Updated on: Feb 12, 2022 | 4:15 AM

जळगाव : दिवस सारखे राहत नाहीत. असे असले तरी निसर्गाची अवकृपा आणि (Market) बाजारपेठेतील चित्र पाहता केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या यंदाच्या हंगामात तरी नवी पहाट उजाडते का नाही अशी अवस्था (Banana Crop) केळी वावरात असताना झाली होती. दरही घटले आणि आवकही. यामुळे उत्पादनावर झालेला खर्च तर सोडाच पण वावरातील केळी तोडणीही होते की नाही या विचारात शेतकरी होते. मात्र, आता परस्थिती सुधारत आहे. थंडीत घट होऊन फेब्रुवारीमध्ये उन्हामध्ये वाढ होताच केळीच्या मागणीत वाढ होईल असाच अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो खरा होताना पाहवयास मिळत आहे. कारण ज्या (Khandesh) खानदेशात केळीचे उत्पादन अधिकचे असते त्या भागात केळीचे दर कमाल 900 रुपये प्रति क्विंटलवर पोहचलेले आहेत. जिल्ह्यातील केळीला आता काश्मिरातील खरेदीदारांकडून मागणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

आगाप नवतीमधील केळीच्या काढणीला सुरवात

खानदेशातील केळीला अधिकची मागणी ही उत्तर भारतामधून आहे. अखेर या भागातील खरेदीदार सक्रिय झाले असून दर्जेदार केळीला मागणी होत आहे. आगाप नवती म्हणजे ज्या केळीची लागवड ही जून-जुलैमध्ये केली जाते. आता या केळीच्या काढणीला वेग आला आहे. सध्या या भागातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, तळोदा, शहदा या भागातील केळी काढणीची कामे जोमात सुरु आहेत. गत आठवड्यात 780 रुपये क्विंटलप्रमाणे मागणी होती. यामध्ये वाढ झाली असून 900 रुपयांपर्यत केळीचे दर गेले आहेत. उत्तर भारतामध्ये केळी पाठविण्यास सुरवात झाली आहे.

खानदेशातील केळी शिवाय आता पर्यायच नाही

उत्तर भारतासह पश्चिम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील केळी काढणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता खानदेशातील केळीच मार्केटमध्ये आहे. त्यामुळे उत्तर भारतासह इतर भागातून केळीच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय या भागातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, तळोदा, शहदा येथे दर्जेदार केळी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथून 180 ते 182 ट्रकमधून केळी बाहेर विक्रीसाठी जात आहे. मागणी अशीच राहिली तर दरातही सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

थंडी कमी होताच दरात वाढ

जानेवारी अखेरपर्यंत राज्यात थंडीची लाट कायम होती. त्यामुळे मागणी तर कमीच होती पण दरही 450 रुपये क्विंटलपर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे केळीची काढणी करावी की नाही अशी परस्थिती झाली होती. अखेर थंडी गायब होताच केळीच्या मागणीत वाढ होत आहे. यंदा अनेक नैसर्गिक संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी केळीची जोापसना केली होती. त्यामुळे वाढीव दरातून आता अधिकचे उत्पन्न मिळावे हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. शिवाय आता निर्यातीचाही मार्ग खुला होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

संबंधित बातम्या :

e-NAM : शेतकऱ्यांना आता एकाच छताखाली सर्व सुविधा, बियाणांपासून बाजारपेठेपर्यंतची सर्व माहिती एकाच अॅपवर

एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर ‘नवा’ पर्याय

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

Follow Us