खात्यातील किमान रक्कमेवर बँकांची हजारो कोटींची वसुली
नवी दिल्ली : हिरे व्यापारी निरव मोदीने पीएनबी बँकेला साडे अकरा हजार कोटी, तर उद्योगपती विजय मल्ल्याने विविध बँकेचं नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशात पोबारा केला. ही रक्कम पाहून तुम्हाला धक्का बसला असेल. पण यापेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे या रकमेपेक्षा जास्त कमाई बँकांनी तुमच्या-आमच्या खिशातून केली आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्रालयाकडूनच ही […]
नवी दिल्ली : हिरे व्यापारी निरव मोदीने पीएनबी बँकेला साडे अकरा हजार कोटी, तर उद्योगपती विजय मल्ल्याने विविध बँकेचं नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशात पोबारा केला. ही रक्कम पाहून तुम्हाला धक्का बसला असेल. पण यापेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे या रकमेपेक्षा जास्त कमाई बँकांनी तुमच्या-आमच्या खिशातून केली आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्रालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, चार वर्षांपेक्षाही कमी कालावधीत (एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2018) बँकांनी 10,391.43 कोटींची वसुली ग्राहकांकडून केली आहे. दोन गोष्टींवर दंड आकारत ही वसुली करण्यात आली आहे. एक म्हणजे खात्यात किमान रक्कम न ठेवणे आणि दुसरं म्हणजे एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतरही व्यवहार करणे.
बँकांनी ग्राहकांकडून वसूल केलेली ही रक्कम विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त आहे, तर निरव मोदीच्या कर्जाच्या 92 टक्के आहे. विशेष म्हणजे ही रक्कम फक्त सरकारी बँकांची आहे. खाजगी बँकांची वसुली ही वेगळीच आहे. सरकारी बँकांच्या तुलनेत खाजगी बँकांचा दंड मोठा आहे. उदाहरणार्थ, 2015-16 ते 2016-17 या वर्षात देशातील तीन खाजगी बँका, अॅक्सिस बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने 4054.77 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यामुळे सरकारी बँकांनी 6246.44 कोटी रुपये दंड वसूल केलाय. तर एका महिन्यात एटीएममधून पैसे काढण्यासाठी जेवढी मर्यादा आहे, ती मर्यादा ओलांडल्यामुळे जो दंड वसूल करण्यात आलाय, तो 4144.99 कोटी रुपये एवढा आहे.
कोणत्या बँकेकडून किती वसुली?
स्टेट बँक ऑफ इंडिया 4447.75 कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक 815.94 कोटी रुपये
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 551.49 कोटी रुपये
बँक ऑफ बडोदा 510.34 कोटी रुपये
कॅनरा बँक 503.35 कोटी रुपये
आरबीआयचा नियम काय सांगतो?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, ग्राहक ज्या बँकेचं एटीएम वापरतात, त्याच एटीएममधून महिन्यातून पाचवेळा मोफत व्यवहार करता येतो. तर मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांसाठी इतर बँकांच्या एटीएममधून महिन्यातून तीन वेळा मोफत पैसे काढता येतील. निश्चित मर्यादेपेक्षा जास्त एटीएम व्यवहार केल्यास किती दंड आकारायचा हा अधिकार संबंधित बँकेचा आहे, पण दंड हा एटीएममधून काढलेल्या रक्कमेच्या 20 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
कोणत्या बँकेत किती किमान रक्कम आवश्यक?
बँक खात्यात किमान रक्कम दंड
एसबीआय 1 ते 3 हजार 5 ते 15 रुपये
बँक ऑफ बडोदा 500 ते 1000 100 ते 200 रुपये
एचडीएफसी 2500 ते 10 हजार 150 ते 600 रुपये
आयसीआयसीआय 1 ते 10 हजार ग्रामीण भाग – किमान रक्कमेच्या 5 टक्के आणि इतर खात्यांसाठी 100 रुपये + किमान रक्कमेच्या 5 टक्के