‘तुम्ही असाल कमल हासन किंवा अजून कोणी…’ एका विधानामुळे अभिनेत्याला मोठी किंमत मोजावी लागली,कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलंच सुनावलं

अभिनेता कमल हसन त्यांच्या एका विधानामुळे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांनी अलिकडेच कन्नड भाषेचा जन्म "तमिळ भाषेतून झाला" असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबत कमल हसन यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

तुम्ही असाल कमल हासन किंवा अजून कोणी... एका विधानामुळे अभिनेत्याला मोठी किंमत मोजावी लागली,कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलंच सुनावलं
kamal hasan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2025 | 2:51 PM

अभिनेता कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच अभिनेता एका अडचणीत सापडला आहे. त्यांच्या एका विधानामुळे कमल हसन चांगलेच अडचणीत आले आहेत. कमल हसन यांनी कन्नड भाषा “तमिळ भाषेतून जन्माला आली” असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र रोष पाहायाला मिळत आहे. एवढंच नाही तर आता कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘तुम्ही कमल हसन असाल पण तुम्ही लोकांच्या भावना दुखावू शकत नाही’ अशा शब्दात त्यांना सुनावलं आहे.

“तुम्ही कमल हसन असाल किंवा आणखी कोणी”

न्यायमूर्ती एम नागाप्रसन्ना यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या वतीने याचिकाकर्त्याने हजेरी लावली आणि युक्तिवाद केला की हे विधान वेगळ्या संदर्भात दिले गेले आहे. ते म्हणाले, “कृपया विधान कोणत्या संदर्भात दिले गेले ते पहा. यावर न्यायालयाने म्हटले की, यासाठी माफीही गरजेचीच आहे. तुम्ही कमल हसन असाल किंवा इतर कोणीही, तुम्ही जनतेच्या भावना दुखवू शकत नाही. भाषेच्या आधारावर हा देश विभागला गेला आहे. कोणताही सार्वजनिक व्यक्ती अशी विधाने करू शकत नाही. कर्नाटकच्या जनतेने फक्त तुमच्याकडून माफी मागितली आहे.” असं म्हणत न्यायालयाने कमल हसन यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत तसेच त्यांना जनतेची माफीही मागण्यास सांगितली आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायालयाने कमल हसन यांच्या विधानवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, “तुम्ही कोणत्या आधारावर विधान केले, तुम्ही इतिहासकार आहात, भाषाशास्त्रज्ञ आहात का? तुम्ही कोणत्या आधारावर विधान केले? न्यायालयाने पुढे म्हटले की, 75 वर्षांपूर्वी असेच विधान करण्यात आले होते आणि त्यावेळी राजगोपाल यांनी माफी मागितली होती.जीभ घसरल्याने काहीही होऊ शकते. बोललेले शब्द मागे घेता येत नाहीत पण माफी मागता येते.” असं म्हणत न्यायालय त्यांच्या माफी मागण्याच्या मागणीवर ठाम आहे.

न्यायालयाचे नक्की काय मुद्दे आहेत?

1) कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते-राजकारणी कमल हासन यांना सांगितले की, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण लोकांच्या भावना दुखावण्याचा नाही. भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार जनतेच्या भावना दुखावतील इतक्या प्रमाणात दिला जाऊ शकत नाही.

2) खरंतर, या विधानानंतर कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपटही अडचणीत आला आहे. यामुळे, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्ससह अधिकाऱ्यांना राज्यात त्यांच्या ‘ठग लाईफ’ या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणू नये किंवा थांबवू नये असे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, तुम्ही सामान्य माणूस नाही आहात.

3) न्यायालयाने कमल हासन यांना सांगितले की, आम्ही आता तुमच्यावर सोडत आहोत. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागा. तथापि, गेल्या आठवड्यात अभिनेत्याने केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता.

4) या प्रकरणात न्यायालयाने म्हटले, “या प्रकरणात, तुम्ही एक विधान केले आहे. ते विधान मागे घ्या… बस्स. कर्नाटकातून करोडो रुपये कमवता येतात… पण जर तुम्हाला कन्नड लोकांची गरज नसेल तर रेवेन्यू सोडून द्या.”

5) न्यायालयाने शेवटी म्हटले, पण आम्ही कोणालाही जनतेच्या भावना दुखावू देणार नाही. जेव्हा चुका होतात तेव्हा तुम्ही म्हणावे, ‘मी या संदर्भात बोललो पण जर त्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो.’

 

 

 

Follow Us