
‘छावा’ रिलीज होऊन आता दोन आठवडे होत आले तरी थिएटरमधील सर्व शो अजूनही हाऊसफूलच दिसतात. ‘छावा’ने प्रेक्षकांच्या मानवर खोलवर परिणाम केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात 200 कोटींहून आणि जगभरात 300 कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची सगळीकडेच तुफान चर्चा आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
मकरंद अनासपुरेंकडून ‘छावाचे’ तोंडभरून कौतुक
त्यात आता अजून एक मराठी अभिनेत्यानेही चित्रपटाचं कौतुक करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मराठमोळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आता ‘छावा’साठी प्रतिक्रिया दिली आहे. मकरंद अनासपुरे यांनी हा चित्रपट कुटुंबासोबत पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आपलं मतही मांडल आहे.
कुटुंबासह पाहिला चित्रपट
छत्रपती शिवजयंतीचे औचित्य साधून मकरंद अनासपुरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहिला. चित्रपट पाहून मकरंद अनासपुरे पुरते भारावून गेले. त्यांनी चित्रपटाचं आणि चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं आहे.
“महाराष्ट्रातील तमाम आई-वडिलांना माझी कळकळीची विनंती”
मकरंद अनासपुरे चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘छावा’चित्रपटाबद्दल म्हणाले की, “अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं असताना आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या मातीविषयी, आपल्या वीरांविषयी सगळ्यांना माहिती असणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील तमाम आई-वडिलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना हा सिनेमा आवर्जून दाखवा. मी गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या ऐकतो आहे. काही हिंदी भाषिक मित्रांच्या प्रतिक्रियाही ऐकल्या की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही?” असं म्हणतं त्यांनी प्रश्नही उपस्थित केला आहे.
“आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवलंय..”
मकरंद अनासपुरे पुढे म्हणाले, “मला असं वाटतं की, सध्याच्या काळात समाजात जातीपाती विसरून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा चित्रपटही योग्य भुमिका बजावेल याची मला खात्री आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवलंय, त्याचं काय करायचं हा सर्वस्वी प्रश्न आपल्या सर्वांचा आहे.”
“धगधगता इतिहास या चित्रपटाने मांडला”
पुढे ते म्हणाले, “आपण सजगतेनं, सवंदेनशिलतेनं हा चित्रपट पाहणं, तो समजून घेणं, इतिहासाची मोडतोड न करता, त्याचं विकृतीकरण न करता, त्याविषयी विचित्र भाष्य न करता आपण सर्वांचा अभिमान, आपण धर्मरक्षक संभाजी महाराज म्हणतो, धर्मासाठी ज्यांनी प्राण त्यागले, त्यांचा धगधगता इतिहास या चित्रपटाने मांडला आहे, त्याबद्दल मी दिग्दर्शक उतेकर यांचे अभिनंदन करतो. विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना व सर्व मराठी मातब्बर मंडळींचे मी अभिनंदन करतो.”असं म्हणत त्यांनी चित्रपटाचं आणि कलाकारांचं कौतुक केलं.
“चित्रपट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे”
तसेच मरकंद अनासपुरे पुढे म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात जातीय वातावरण कलुषित करण्याचं जे काम होतंय, त्यामध्ये हा सिनेमा निश्चितच एक उत्तम मलमाचं काम करेल, याची मला खात्री आहे. आपला हा इतिहास जपला पाहिजे आणि सोबतच हा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मध्यंतरी कोल्हापूरच्या संभाजी छत्रपतींनी जी सूचना केली फार महत्त्वाची वाटली. महाराष्ट्रातील जे मातब्बर इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत त्यांनी अभ्यासपूर्ण एक शिवचरित्र लिहावं आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे इतिहासाची जी मोडतोड होते किंवा त्याविषयी हलक्या दर्जाची विधानं करण्याची सवय मोडीत निघेल, अशी अपेक्षा आहे. मी खासकरून हा चित्रपट पाहिल्यावर लहान मुल ढसाढसा रडले, जेव्हा ते मी पाहिलं तेव्हा समाधान वाटले की, कशाप्रकारे आपला इतिहास हा जाज्वल्यपणे आपल्यासमोर येतो आहे. सिनेमा म्हणून याचा व्यवसाय किती होईल हे महत्त्वाचे नाही परंतु या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” असं म्हणतं त्यांनी ‘छावा’ चित्रपट थेट काळजाला भिडणारा असल्याचं त्यांनी म्हटलं.