पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (24 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray on Financial package).

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 3:07 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा व्हावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे (CM Uddhav Thackeray on Financial package). या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. पॅकेज घोषित करण्यापेक्षा सध्याच्या घडीला आरोग्य सुविधा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज (24 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray on Financial package).

“काहीजण असं विचारतात की, तुम्ही पॅकेज का नाही दिलं? अहो सगळं काही देतो. सर्वात अगोदर जे संकंट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकंट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आजपर्यंत खूप पॅकेज वाटलं गेलं. किती पॅकेजेस आली? लाखो कोटींची पॅकेज आली. वरती सगळं फार छान पॅकेज असतं. उघडल्यावर कळतं रिकामा खोका आहे. हे असं पोकळ घोषणा करणारं आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आरोग्य सुविधा निर्माण करणे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं आहे. सर्व वर्गासाठी मदत केली पाहिजे.”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी 481 ट्रेन सोडल्या. त्याने सहा ते सात लाख मजूर गावी गेले. यामध्ये 85 कोटी रुपये खर्च झाले. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत झाली. पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली. 3 लाख 80 हजार नागरिकांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं. यामध्ये 75 कोटी रुपये खर्च झाले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“आपण मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. मार्च-एप्रिलपासून हे संकंट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्यामुळे आपण लॉकडाऊन घोषित केला आहे. याशिवाय शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा, मास्क लावा अशा सूचना देत आहोत. या सूचना काही दिवस आपल्याला पाळाव्या लागती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आपल्याला खबरदारी घेण्यासाठी हा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्रात सध्या 33 हजार 786 रुग्णांवर उपचार सुरु आहे. 13 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. हे सगळं आपण दाखवलेल्या संयममुळे शक्य झालं”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी आल्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे. हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. यापुढची लढाई आणखी बिकट आहे. कारण हा गुणाकार आता जीवघेणा होणार आहे. आपल्याकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढणार आहे. जसे आतापर्यंत वाढले आहेत तसे येत्या काही काळात ते आणखी वाढतील. पण घाबरण्याचं कारण नाही. आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा निर्माण करत आहोत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध राहतील.जास्तीत जास्त रुग्णांना व्हेंटिलिटर पेक्षा ऑक्सिजनची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे जास्तीत जास्त बेड्ससोबत ऑक्सिजनची व्यवस्था आपण करत आहोत. फिल्ड हस्पिटलमध्ये आयसीयू बेडची व्यवस्था करत आहोत. हे केवळ आपण महाराष्ट्रातच करु शकतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय केली आहे. राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा आहे. इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावं”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

“पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा. रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या. सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा”, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जनतेला केली.

“मराठवाडा, विदर्भसह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहीला”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, “राज्यात 50 हजार उद्योग सुरु, सहा लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत”, असंदेखील त्यांनी सांगितलं.

“राजकारण करु नका. तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास आहे. आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

“राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार आहे. आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे. पण कोरोनाला टाळून करायचं आहे. महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार याकडेही लक्ष आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ईद घरात बसून साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा
  • गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या
  • मार्च-एप्रिलपासून कोरोना संकंट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही
  • मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज 33 हजार 786 अॅक्टिव्ह रुग्ण, 47 हजार हा एकूण आकडा, जवळपास 13 हजार कोरोनामुक्त
  • महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 जणांचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार, मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी
  • कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे, सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील
  • जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय, राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे
  • पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या
  • सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा
  • मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला
  • पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे, असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोललो, 50 हजार उद्योग सुरु, सहा लाख कामगार रुजू
  • शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, 75 ते 80 टक्के कापूस खरेदी, राजकारण करू नका, तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही, महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास, आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही
  • लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता ‘लॉकडाऊन’ शब्द वापरु नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे
  • हळूहळू काय उघडणार याची यादी मी देत राहेन, गर्दी करू नका, एखादे दुकान सुरु झाल्यावर ते पुन्हा बंद होणार नाही याची काळजी घ्या, आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.