पाकिस्तानमध्ये सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला, 5 चीनी नागरिक ठार; पाक हादरलं
पाकिस्तानमध्ये दोन दिवसात सलग दुसरा मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाच चीनी नागरिकांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मारले गेलेले सर्व चीनी नागरिक इंजिनीअर असल्याचं सांगितलं जात आहे. चीनी नागरिकांना टार्गेट करण्यासाठीच हा हल्ला केला गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच घबराट पसरली आहे.
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील तुर्बत अंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका बड्या हल्ल्याने पाकिस्तान हादरून गेलं आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे. शांगला जिल्ह्यात हा हल्ला झाला असून या हल्ल्यात पाच चीनी नागरिकांसह 6 जण ठार झाले आहेत. चीनी नागरिकांच्या वाहनांना टार्गेट करण्यासाठीच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानात दोन दिवसात लागोपाठ हल्ला झाल्याने पाकमधील नागरिक भयभीत झाले आहेत.
खैबर पख्तूनख्वातील शिंगलाच्या बिशाम तालुक्यात स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक बसताच एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे एकच आफरातफर माजली. स्फोटानंतर जाळ आणि धूर निघाला. त्यामुळे नागरिक घाबरले आणि जीवमुठीत घेऊन सैरावैरा धावू लागले. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने धडक दिल्यानंतर दुसरे वाहन दरीत कोसळलं. या हल्ल्यात पाच चीनी नागरिक ठार झाले तर एक पाकिस्तानी नागरिक दगावला. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दासू कँपकडे जाताना हल्ला
हल्ल्यात मारले गेलेले सर्व चीनी नागरिक इंजीनिअर होते. ते सर्व जण दासू येथील शिबीरात जात होते. यापूर्वीही दासू येथील शिबीरांना अतिरेक्यांनी लक्ष्य केलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांनी या शिबीरातील चीनी नागरिकांना लक्ष्य केलं आहे. यापूर्वी 2021मध्ये एक मोठा हल्ला झाला होता. त्यावेळी एका बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यात 9 चीनी नागरिकांसह एकूण 13 लोक मारले गेले होते. या हल्लेखोरांनी नवल एअरबेसवर हल्ला केला आहे. त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. हा एअरबेस चीन आणि पाकिस्तानचा इकोनॉमिक कॉरिडोअर असल्याचं सांगितलं जात आहे.
चीनी नागरिकांवरील हल्ले वाढले
गेल्या दोन तीन वर्षापासून पाकिस्तानात चीनी नागरिकांवरील हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत पाकिस्तानाच एक डझनहून हल्ले झाले असून त्यातील सर्वाधिक हल्ले हे चीनी नागरिकांवर झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक चीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायकबाब म्हणजे यातील सर्वाधिक हल्ले हे खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान परिसरात झाले आहेत. या हल्ल्यानंतर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाहीये.
बलूचिस्तानमध्ये यावर्षी झालेल्या हल्ल्यापैकी हा तिसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वीच्या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली होती. आधी दोन्ही हल्ले सुरक्षा दलाने उधळून लावले होते. वर्षाच्या सुरुवातीला मछ शहरात सुरक्षा दलावर हल्ला करणअयात आला होता. त्यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांना मछ तुरुंगात जायचं होतं. त्यासाठी त्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला होता.