Nishikant Kamat | “दो अक्तूबर को पणजी में स्वामी चिन्मयानंद जी का सत्संग था”… निशिकांत कामत यांनी असा साकारला ‘दृश्यम’

| Updated on: Aug 17, 2020 | 5:42 PM

'दृश्यम' हा 2013 मधील मल्ल्याळम चित्रपटाचा रिमेक. मात्र सिनेमाचा रिमेक करताना संपूर्ण पार्श्वभूमी बदलल्याचं दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी सांगितलं होतं.

Nishikant Kamat | दो अक्तूबर को पणजी में स्वामी चिन्मयानंद जी का सत्संग था... निशिकांत कामत यांनी असा साकारला दृश्यम
Follow us on

मुंबई : अजय देवगण, तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. सिनेमातील प्रत्येक सीन आणि संवाद चाहत्यांना तोंडपाठ आहेत. “दो अक्तूबर को पणजी में स्वामी चिन्मयानंद जी का सत्संग था, हम सब वहा पे गये थे” या संवादाची पार्श्वभूमी आणि त्याचे जोक्स अनेकांच्या स्मरणात असतील. (Nishikant Kamat Dies Fans remembering his film Drishyam)

‘दृश्यम’ हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा. ‘दृश्यम’ या 2013 मधील मल्ल्याळम चित्रपटाचा तो रिमेक. मात्र सिनेमाचा रिमेक करताना संपूर्ण पार्श्वभूमी बदलल्याचं दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी सांगितलं होतं.

‘दृश्यम’ या संस्कृत शब्दाचा अर्थ दृश्य किंवा डोळ्यांना जे दिसतं ते, असा साधा-सोपा. मात्र या सिनेमाच्या बाबतीत म्हणायचं तर “जे आहे ते दिसत नाही, आणि जे दिसतं तसं नसतं” असं अजय देवगण म्हणाला होता.

“दृश्य ही फसवणारी असू शकतात, हीच सिनेमाची थीम आहे. ‘दृश्यम’चे कथानक बेतलेले असले, तरी हा सरळसरळ रिमेक नाही. आम्ही मल्ल्याळम चित्रपटाची पार्श्वभूमी बदलली. विजय साळगावकर हा कोकणी माणूस आमचा हिरो झाला.” असं निशिकांत सांगायचे.

सर्वांना दोन गोवा माहित आहेत. एक बॉलिवूडच्या चित्रपटात दिसणारे पर्यटन स्थळ.. ज्यात समुद्र किनारे, बिकिनी, बियर, पार्ट्या असलेला गोवा दिसतो. तर दुसरा ग्रामीण गोवा. जो 70 किमी दूरवर वसला आहे. आम्ही तिथेच सिनेमाचे लोकेशन मांडले, असे निशिकांत यांनी सांगितले होते. 48 कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या सिनेमाने देशभरात 93.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. (Nishikant Kamat Dies Fans remembering his film Drishyam)

‘दृश्यम’चे कथानक काय?

विजय साळगावकर (अजय देवगन) हा ‘दृश्यम’ सिनेमाचा हिरो. तो चौथी पास आहे. पत्नी आणि दोन मुलींसह तो गोव्यात राहतो. त्यापैकी मोठी मुलगी अनु ही दत्तक कन्या. अनुसोबत अशा काही घटना घडतात, की तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या सॅमचा तिच्या हातून खून होतो. आणि मग सुरु होतो एक विचित्र खेळ. आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी विजय साळगावकर कोणत्या थराला जातो, हे या सिनेमात पाहायला मिळते. सर्वसामान्य कुटुंबातील वातावरण असल्याने अनेक जण त्याला स्वत:शी रिलेट करु शकतात.

हत्येच्या दिवशी आपण घरी नव्हतो हे भासवण्यासाठी विजय एक कथानक रचतो. आपले संपूर्ण कुटुंब त्या दिवशी फिरायला पणजीला गेले होते, अशी खोटी स्टोरी तो रचतो. “दो अक्तूबर को पणजी में स्वामी चिन्मयानंद जी का सत्संग था, हम सब वहा पे गये थे” हे तो कुटुंबाच्या मनावर बिंबवतो, आणि त्याच्या दोन्ही मुली ही कहाणी प्रत्येकाला सांगतात. सिनेमाच्या अखेरीस विजय अप्रत्यक्षरित्या आपल्या गुन्ह्याची उकल करतो. ही कहाणी प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे.

निशिकांत कामत यांनी साकारलेला ‘दृश्यम’ हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वोत्तम रहस्यपटांपैकी एक सिनेमा असल्याचं चाहते आजही सांगतात.