नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्याने दोन्ही देशांमधलं राजकारण तापलेलं आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनला रवाना झाल्या आहेत. तिथे चीन-रशिया-भारत या तीन देशांच्या बैठकीला त्या उपस्थिती लावतील. या बैठकीमध्ये त्या सीमेच्या पलिकडील दहशतवादावरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर जवळपास 50 पेक्षा जास्त देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं होतं आणि या हल्ल्याचा निषेधही केला होता. इस्रायलने तर आम्ही लागेल ते भारताला विनाअट देऊ, असं म्हटलं होतं. आता एअर स्ट्राईकनंतरही विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियननेही भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन केलंय. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन या देशांनी केलंय.
या एअर स्ट्राईकनंतर जगभरातील विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा कळवळा असलेल्या चीनचीही प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त लू कांग यांनी भारत आणि पाकिस्तानला शांततेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. भारत आणि पाकिस्तान दोघेही दक्षिण आशियातले महत्त्वाचे देश आहेत. त्यांनी संबंध सुधारण्यातच दोन्ही देशांचं हित आहे आणि यामुळेच दक्षिण आशियात शांतता राहू शकेल, असं चीनने म्हटलंय.
भारताला ओआयसीचं निमंत्रण
जागतिक स्तरावर भारताने आणखी एक यश मिळवलंय असं म्हणता येईल. अबू धाबीमध्ये 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी मुस्लीम देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) भारताला पाहुणा देश म्हणून निमंत्रण दिलंय. जगातील देशांसोबत भारताचे वाढते संबंध पाहता या संघटनेने हे पाऊल उचललंय. शिवाय भारतात मुस्लिमांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. भारतानेही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या स्वतः या परिषदेसाठी उपस्थित राहतील. पण भारताला हे निमंत्रण मिळाल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झालाय.