Kolhapur Flood Live : कोल्हापूर-सांगली अद्याप पाण्यात, इंधनाचा तुटवडा, मुख्यमंत्री पाहणी करणार

| Updated on: Aug 08, 2019 | 11:06 AM

कोल्हापूर आणि सांगलीत अनेक भागात 8 ते 9 फूट इतकं पाणी भरलं आहे. आर्मी,नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफ, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, विविध संस्थांमार्फत दोन्ही जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Kolhapur Flood Live : कोल्हापूर-सांगली अद्याप पाण्यात, इंधनाचा तुटवडा, मुख्यमंत्री पाहणी करणार
Follow us on

Kolhapur Flood कोल्हापूर/ सांगली : महापुराने हतबल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा वेढा कायम आहे. रात्रीपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती, पण पहाटेपासूनच धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली. कोल्हापूर आणि सांगलीत अनेक भागात 8 ते 9 फूट इतकं पाणी भरलं आहे.  आर्मी,नेव्ही, कोस्ट गार्ड, एनडीआरएफ, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, विविध संस्थांमार्फत दोन्ही जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र जोपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत पुराचं पाणी कमी होणार नाही. राधानगरी धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी वाढलेलीच आहे.

महापुराने कोल्हापूरची चहूबाजूने कोंडी झाली आहे. जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद आहेत. पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्याचा परिणाम दूध, भाज्या, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसला आहे. परिणामी कोल्हापूर आणि परिसरातून मुंबई-पुण्याकडे येणाऱ्या दुधावर बसला आहे. इथे दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पूरग्रस्त दौऱ्यावर

दरम्यान, पूरस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. काल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे कोल्हापुरात दाखल झाले.

पेट्रोल-भाजीपाल्याची टंचाई

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा मोठा फटका शहरी भागात बसत आहे. शहरातील पेट्रोल-भाजीपाल्याची मोठी टंचाई जाणावत आहे. कृष्णा- पंचगंगा नद्यांना महापूर आल्याने दोन्ही नद्यांच्या पात्रांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यात धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यातील 30 ते 35 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक खेडेगावांना पुराचा वेढा बसला आहे. पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून मोठी मदत केली जात आहे. शाळा, मंगल कार्यालय, संस्थांनी पूरग्रस्तांना राहण्याची सोय केली आहे.

सांगलीची भीषण अवस्था

सांगलीतील कृष्णा नदीच्या महापुरामुळे सद्यस्थिती गंभीर होत चालली आहे. धोक्याची पातळी ओलांडलेल्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 56 फूट 8 इंच इतकी पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यातील 70 लोकांना आणि 21 हजार जनावरांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.

इस्लामपूर

पूरपरिस्थितीमुळे आता साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.  रेस्क्यू कॅम्पमधील काही लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे. त्यामुळे रुग्णांना सरकारी दवाखान्यात हलवण्यात येत आहे. इस्लामपुरातील कॅम्पमधील एका व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली.  इस्लामपुरात सात ठिकाणी रेस्क्यू कॅम्प आहे.  एका कॅम्पमध्ये तीनशे ते चारशे लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.  सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधीकडून लोकांना मदत करण्यात येत आहे.

रत्नागिरीत इंधन तुटवडा

रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी इंधन,दूध आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे. पेट्रोल, डिझेल तुटवड्यामुळे शहरातील पेट्रोल पंप बंद आहेत. गोकुळ, कृष्णा, वारणा, अमूल आदी दुधाच्या कोणत्याच गाड्या रत्नागिरीत न आल्याने जिल्ह्यात दूध टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे 60 हजार लिटर तर रत्नागिरी तालुक्यात 30 हजार लिटर दुधाची विक्री होते.

मिरज मार्गावरील पाण्याची पातळी अजून वाढल्याने दुसऱ्या दिवशी देखील दूध रत्नागिरीत येण्याची शक्यता नसल्याची माहिती मिळत आहे.

पुणे –

खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी ४१६२४ क्यूसेक असून, त्यामध्ये वाढ करून नऊ वाजता  ४५४७४ क्यूसेक्स इतके करण्यात आले. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोयना

सकाळी 9 वाजता कोयना धरणाचा विसर्ग 83178 क्यूसेक करण्यात आला आहे.  कोयनेचे दरवाजे 10 फुटावर उघडण्यात आले आहेत.

पुणे-बंगळुरु महामार्गावर रांगा

कोल्हापूर आणि सांगलीतील पुरपरिस्थीमुळे पुणे-बंगळुरु हायवे ठप्प आहे. त्यामुळे अनेक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कराडपासून कोल्हापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.