भाजप आमदारानंतर जयंत पाटलांचीही पूरग्रस्तांच्या मदतीच्या पाकिटावर स्टिकरबाजी

| Updated on: Aug 11, 2019 | 2:10 PM

भाजप आमदाराने पूरग्रस्तांना पाठवलेल्या मदतीच्या पाकिटांवर स्वतःचा फोटो छापला म्हणून आगपाखड करणाऱ्या विरोधकांपैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांचाच कित्ता गिरवलेला दिसत आहे

भाजप आमदारानंतर जयंत पाटलांचीही पूरग्रस्तांच्या मदतीच्या पाकिटावर स्टिकरबाजी
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने पूरग्रस्तांना पाठवलेल्या मदतीच्या पाकिटांवर भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी स्वतःचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो आणि नाव असलेले स्टिकर छापल्यामुळे सर्व स्तरातून टीका झाली होती. भाजप सरकारवर निशाणा साधणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही आता हाच कित्ता गिरवल्याचं दिसत आहे. पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या खाद्य पदार्थांच्या बॉक्सवरही त्यांचे फोटो असलेले स्टिकर लावण्यात आले आहेत.

कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. याशिवाय राज्य सरकारनेही मदत जाहीर केली. भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांसह स्वतःचे फोटो लावून जाहिराबाजी केल्यानंतर सर्वसामान्यांपासून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे.

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून पाठवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या बॉक्स आणि प्लास्टिकच्या डब्यांवर जयंत पाटलांनी आपले फोटो असलेले स्टिकर लावले आहेत. त्यामुळे नेते मंडळींच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, खाद्यपदार्थांसाठी आधीच छापलेले जुने बॉक्स वापरल्याची सारवासारव जयंत पाटील यांनी केली आहे. एक ऑगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध शाळांत वाटण्यासाठी खाऊचे बॉक्स तयार करण्यात आले होते. चार तारखेपासून पुराची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. त्यावेळी आम्हाला कुठेही बॉक्स आणि पॅकिंगसाठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.


मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही. अजूनही आम्हाला बॉक्सची कमतरता आहे. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी बॉक्स व पॅकिंग मटेरियल पाठवावे, असं उलट आवाहन करायलाही ते विसरले नाहीत.

बापाच्या घरातून देताय का?, फूड पाकिटावरील भाजप नेत्यांच्या फोटोवर राजू शेट्टींचा संताप

शासनाकडून प्रत्येक पूरग्रस्तांना दहा किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मदतकार्य सुरु झालं, पण भाजपकडून मदतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ‘सरकार जी मदत करतंय ते काही उपकार करत नाही. जी मदत देताय ती तुमच्या बापाच्या घरातून देताय का?’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

महाजनांनी सेल्फी काढला नाही, धान्याच्या पाकिटावर महाराष्ट्र सरकारचेच स्टिकर : मुख्यमंत्री

बारामतीत पवारांनी बैठक बोलावली, अर्ध्या तासात एक कोटी रुपये जमले

सेल्फी व्हिडीओवरील ट्रोलिंगला उत्तर, गिरीश महाजन छातीभर पाण्यातून बचावकार्यात

सांगली-कोल्हापूरकरांची पुराशी झुंज, तर सत्ताधारी पक्षप्रवेशात गुंग

येडियुरप्पा आणि फडणवीसांना फोन, पूर हटवण्यासाठी कोल्हापूरचे जावई सक्रिय

घरात पुराचं पाणी शिरल्यास मिळणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ