जावयाची गाढवावरुन मिरवणूक, बीडमधली अनोखी परंपरा
बीड : बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून, त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 81 वर्षांपासून सुरु आहे. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात. साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस […]
बीड : बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून, त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 81 वर्षांपासून सुरु आहे. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे, याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते. अन् धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.
यंदा मात्र अनेक तरुण जावयांनी पोबारा केल्यानं गावातील ज्येष्ठ जावई बंडू पवार यांची गाढवावर बसण्याकरीता वर्णी लागली. जावयाची मिरवणूक संपूण गावातून वाजत-गाजात काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर चढवण्यात येते.
विशेष म्हणजे, एकदा गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही. सासरच्या मंडळीकडून आपेक्षा करीत रुसवा-फुगवा करीत आपली ऐट दाखवणारा जावई मात्र विडा गावात निपचितपणे गाढवावर बसून गावकऱ्यांसह स्वत:ही धुलिवंदनाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतो. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही, तर संपूर्ण देशातले पहिलेच आहे.